Homeमुंबई स्पेशल१२ राशी व...

१२ राशी व २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व पाहा भक्ती पार्क उद्यानात!

पूर्व उपनगरातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. भक्ती पार्कमधील या नागरी वनात लागवड केलेल्या ५७ हजार झाडांनी चांगलाच जोम धरला असून ती वेगाने बहरत आहेत.

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा नागरी वने (मियावाकी) संकल्पनेची मुहूर्तमेढ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा (पूर्व) येथील भक्ती पार्क उद्यानातून करण्यात आली होती. पालिका क्षेत्राच्या पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीतकमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी संकल्पनेवर आधारित ‘मियावाकी’ वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प गेल्या दीड वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ भक्ती पार्कमधून २६ जानेवारी २०२० रोजी झाला होता.

या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ९८ हजार ३६९ चौरस मीटर इतके आहे. या भूभागाचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. पैकी, ५८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्यान विकसित करण्यात आले आहे. तर उर्वरित ४० हजार चौरस मीटर क्षेत्रावर खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. परदेशी यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या विभागाचे कर्मचारी व अधिकारी या उद्यानाच्या उभारणीसह देखभालीचे काम करत आहेत.

भक्ती पार्क उद्यानात जपानी शैलीनुसार विविध सेवासुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे ३ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा जॉगिंग ट्रॅक पदपथ, गजीबो, हिरवळ (लॉन), रंगबेरंगी फुलझाडे, टॉपिअरी व अद्ययावत सुविधांचा समावेश आहे.

या उद्यानात देशी, परदेशी औषधी प्रजातींची सुमारे २ हजारपेक्षा मोठी फुलझाडे व फळझाडे आहेत. यामध्ये प्रामुख्याने खैर, सुरंगी, आवळा, अर्जुन, पिंपळ, उंबर, बकुळ, आंबा, जांभूळ, कांचन, बदाम, निलगिरी, फणस, भोकर, बेल, सुरू, रॉयल पाम, कडीपत्ता, नारळ इत्यादींचा समावेश आहे.

भक्ती पार्क उद्यानात १२ राशींचे व २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे नक्षत्र उद्यान फुलले आहे. विशेष म्हणजे यातील बरीच झाडे दुर्मिळ आहेत. नक्षत्र उद्यानाला भेट देणार्‍याला आपल्या राशीचे कोणते झाड आहे, याची माहिती मिळते. राशी व नक्षत्रानुसार एकूण २७ प्रजातींचे मोठे वृक्ष असून यामध्ये वड, पिंपळ, आवळी, उंबर, जांभळी, खैर, वेलु, नागचाफा, पळस, बेल, अर्जुन, सांबर, फणस, शमी, रुई, कडूलिंब, मोह, इत्यादींचा समावेश आहे.

या उद्यानातील मियावाकी संकल्पनेवर आधारित नागरी वन प्रकल्पात जवळपास ५७ हजार इतक्या संख्येने व प्रामुख्याने देशी व औषधी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात पळस, बेहडा, सीताफळ, बेल, पेरू, सीता, अशोक, हरडा, खैर, बदाम, काजू, रिठा, बकुळ, आवळा, अर्जुन अशा प्रजातींचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये सदर वृक्षांचे घनदाट जंगलात रूपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत विविध प्रजातीची फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचा नैसर्गिक अधिवास म्हणूनदेखील हे उद्यान विकसित होत आहे. निरनिराळ्या प्रजातींची झाडे विपुल प्रमाणात एकाच उद्यानात उपलब्ध असल्याने अनेक किशोरवयीन विद्यार्थी तसेच वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरिक या उद्यानास भेट देतात. पक्षीनिरीक्षण करणार्‍यांसाठी हे उद्यान म्हणजे पर्वणीच ठरत आहे.

विस्तीर्ण व विविध वैशिष्ट्यांमुळे या उद्यानाचे सौंदर्य सिनेसृष्टीलादेखील खुणावत आहे. या उद्यानात चित्रपट तसेच जाहिरातींचे चित्रिकरण करण्यासाठी वाढती मागणी असून पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार विहित शुल्क आकारून चित्रिकरणाकरिता परवानगी देण्यात येते. मुंबई महानगरातील अनेक कॉर्पोरेट / व्यावसायिक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांसाठी विविध खेळाचे सामने या उद्यानाचा भाग असलेल्या मैदानी भागाच्या हिरवळीवर पालिकेची पूर्वपरवानगी घेऊन व आवश्यक शुल्क भरुन आयोजित करतात. एकूणच भक्ती पार्क उद्यान हे विरंगुळ्यासोबत पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील आगामी काळात अधिकाधिक आकर्षणाचा भाग ठरेल, यात शंका नाही.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चापासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content