योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीतजास्त परतावा मिळवता येतो. गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते. पण त्यांच्यावर अवलंबूनच तुम्ही एखाद्या उत्पादनात गुंतवणूक का करायची किंवा करू नये, हे ठरवता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित व्याजदर. कोणतेही गुंतवणूक उत्पादन तुम्हाला भविष्यातील व्याजदराची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही. मात्र, या प्रमुख नियमांमुळे तुम्हाला माहितीपर मार्गदर्शन मिळू शकते. गुंतवणुकीच्या ७ नियमांबद्दल विस्ताराने सांगताहेत ग्रोचे सहसंस्थापक आणि सीओओ हर्ष जैन.
नियम १- ७२चा नियम: आपला पैसा दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, हे ७२चा नियम ठरवतो. समजा तुम्ही १,००,००० रुपये गुंतवले आणि वार्षिक १०% परताव्याची अपेक्षा केली. मग तो पैसा किती वर्षांत दुप्पट होईल? या नियमानुसार, परताव्याच्या अपेक्षित व्याजदराने ७२ला भाग दिला तर, त्याचे आलेले उत्तर म्हणजे तुमचा पैसा दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे. म्हणून, दुप्पट होण्याचा कालावधी= ७२/परताव्याचा दर.
या उदाहरणात, परताव्याचा अपेक्षित दर १०% प्रति वर्ष आहे, म्हणून, दुप्पट होण्याचा कालावधी = ७२/१० = ७.२ वर्षे. म्हणून, ७.२ वर्षांत तुमची गुंतवणूक दुप्पट होईल, अशी अपेक्षा तुम्ही करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की, जी गुंतवणूक चक्रवाढ व्याज देते, त्याच प्रकारासाठी हा नियम लागू होतो.
नियम २- ११४चा नियम: ७२च्या नियमासारखेच तत्त्व वापरून आपली गुंतवणूक किती वर्षांत तिप्पट करायची हे ठरवण्यासाठी ११४चा नियम वापरता येईल. या नियमानुसार, आपण अपेक्षित परताव्याच्या दराने ११४ला भाग दिला तर पैसा तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा अचूक अंदाज मिळवता येतो. म्हणून, तिपटीचा कालावधी = ११४/परताव्याचा दर. आपण १००,००० रुपये १०% प्रति वर्ष या अपेक्षित दराने गुंतवले तर, तिपटीचा कालावधी = ११४/१० = ११.४ वर्षे.
नियम ३- १४४चा नियम: ७२ आणि ११४च्या नियमाप्रमाणेच, तुम्हाला तुमची गुंतवणूक किती वर्षांत चौपट हवी आहे, हे ठरवायचे असल्यास, तुम्ही १४४चा नियम वापरू शकता. या नियमाप्रमाणे, अपेक्षित परताव्याच्या दराने तुम्ही १४४ला भाग दिला तर तुम्हाला तुमचा पैसा चौपट करण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा अचूक अंदाज येईल. म्हणून, चौपटीचा कालावधी = १४४/परताव्याचा दर. तुम्ही प्रति वर्ष १०% दराने परताव्याच्या अपेक्षेने १,००,००० रुपये गुंतवले तर, चौपटीचा कालावधी = १४४/१० = १४.४ वर्षे. म्हणून, १४.४ वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक तिप्पट होईल, अशी अपेक्षा ठेवू शकता. याठिकाणी हे महत्त्वाचे आहे की, चक्रवाढ व्याज देणाऱ्या गुंतवणुकीसाठीच हा नियम लागू होतो.
नियम ४- किमान १०% गुंवतणुकीचा नियम: आपण पैसा कमवायला सुरुवात करतो तेव्हा बचत आणि गुंतवणूक ही सहसा लक्षात येण्यासारखी गोष्ट नाही. तथापि, तुम्हाला चक्रवाढ व्याजदराच्या शक्तीचा लाभ घ्यायचा असेल तर गुंतवणुकीस लवकर सुरुवात महत्त्वाची आहे. गुंतवणुकीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या पगाराच्या किमान १०% पैशांची गुंतवणूक केली पाहिजे आणि दरवर्षी त्यात १० टक्क्यांची वाढ केली पाहिजे.

नियम ५- १०० वजा वयाचा नियम: ‘१०० मायनस एज रुल’, हा इक्विटी आणि कर्ज यामधील विवरणाचा अंदाज येण्यासाठी मदत करू शकतो. या नियमाप्रमाणे, तुम्हाला १००मधून तुमचे वय वजा करावे लागते. येणारे उत्तर हे तुम्हाला लागू होणारे इक्विटी एक्सपोजरची टक्केवारी असते. उर्वरीत रक्कम कर्जात गुंतवू शकता. निवृत्तीचे वय आल्यावर इक्विटीचे वाटप कमी झाले पाहिजे, या समजानुसारच हा नियम काम करतो.
नियम ६- आपत्कालीन निधीचा नियम: आयुष्य अनिश्चित आहे. आर्थिक संकटांसाठी तुम्ही नेहमी सज्ज असले पाहिजे. म्हणून, बहुतांश आर्थिक तज्ज्ञ तरुण गुंतवणुकदारांना गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आपत्कालीन निधी बाजूला ठेवण्याचा सल्ला देतात. या नियमाप्रमाणे, तुम्हाला किमान ३ ते ६ महिने पुरेल एवढा मासिक खर्च भागेल एवढा निधी बाजूला ठेवला पाहिजे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत पैशांची अति निकड भासणे टाळता येईल. हा आपत्कालीन निधी तरल असला पाहिजे, तसेच संकटकाळात सहजपणे मिळवता आला पाहिजे.
नियम ७- ४% पैसे काढण्याचा नियम: गुंतवणुकीच्या नियमापेक्षा हा नियम अधिक आर्थिक शिस्त लावणार आहे. याला खरोखरच महत्त्व आहे. बहुतांश लोक त्यांच्या निवृत्तीच्या वयाकरिता बचत करण्याचा प्रयत्न करतात. स्वत:चा बचाव करण्यासाठी संचय करतात. मात्र, महागाईचा दर अनिश्चित असल्याने, अकालीच हा निधी वाया जाण्याचा धोका आहे. ४% पैसे काढण्याचा नियम हा विशेषत: निवृत्तीधारकांसाठीच आहे. जेणेकरून त्यांची बचत वेगाने खर्च न होता एक निरंतर उत्पन्नाचा स्रोत सुरू राहिल.
या नियमाप्रमाणे, तुम्ही प्रत्येक वर्षी तुमच्या निवृत्तीच्या संचयाच्या ४% पैसे काढले तर तुमच्या राहण्याचा खर्च व्यवस्थापित करता येईल. या नियमानुसार, तुमचा निवृत्तीचा संचय १ कोटी रुपये असेल तर तुमचा राहण्याचा खर्च व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही दरवर्षी ४ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू नयेत.
गुंतवणुकीसाठीचे हे नियम कोणत्याही गुंतवणूकदारासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. महत्त्वाची सूचना म्हणजे, हे नियम अंधपणाने पाळता येणार नाहीत. विवेक ही यशस्वी गुंतवणूकदाराची ओळख आहे. गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या परीने पर्यायांचा शोध घेऊन गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा केली पाहिजे. लक्षात ठेवा, गुंतवणुकीचा उत्तम पोर्टफोलिओ हा आपली जोखिमीची सहनशक्ती आणि गुंतवणुकीचे क्षितीज लक्षात घेत, आर्थिक उद्दिष्टांच्या दिशेने कार्य करतो.