भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.
गेले दोन दिवस बिहारच्या नालंदा आणि आसपासच्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नालंदा जिल्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मतदारसंघ आहे. बुधवारी झाडे तसेच विजा कोसळून बिहारमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. काल अशाच घटनांमध्ये ६१ जणांचा बळी गेल्याचे बोलले जाते. येत्या तीन दिवसांत तेथील हवामानात काडीचाही बदल होण्याची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहवे, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तराखंडमध्येही काल तुफान वृष्टी झाल्यामुळे चमोली परिसरातील पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून जाणारा गाळ नंदप्रयाग बाजारापर्यंत पोहोचला. आज सकाळी तेथे मदतकार्य करताना रस्त्यावरील चिखल दूर करून ते मोकळे केले जात होते.