कोविड-१९चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस (मात्रा) घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर, गुरुवारी, ९ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे यादिवशी या केंद्रांवर कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. मात्र, लसीकरणाच्या खाजगी केंद्रांवर निर्धारीत शुल्क देऊन इच्छुकांना लसीचा पहिला डोस घेता येईल.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१पासून कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत प्रारंभी क्रमाक्रमाने प्राधान्य गट आणि त्यानंतर १ मे २०२१पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
लसीकरणासाठी मुंबई महानगरात पालिका व शासकीय रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ६ सप्टेंबर २०२१पर्यंत एकूण ७१ लाख २४ हजार ८२० लाभार्थ्यांना (७९ टक्के) लसीची पहिली मात्रा तर २८ लाख ५० हजार ५५४ एवढ्या लाभार्थ्यांना (३१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशांमधील सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी उपनगरीय रेल्वेप्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच काही खासगी आस्थापनादेखील पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची अनुमती देत आहेत. यानुषंगाने, दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांसाठी लस मात्रांच्या उपलब्धतेनुसार विशेष लसीकरण सत्र सर्वप्रथम ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले हेाते. या लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यादिवशी १ लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.
हा प्रतिसाद लक्षात घेता तसेच नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची प्राथमिकता पाहता, मुंबईतील सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर, गुरुवारी, ९ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे यादिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. त्यामुळे दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी या सत्राचा जास्तीतजास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

