मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेवरून दिल्लीत येत्या ३० एप्रिल व १ मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असून मनोरंजनाबरोबरच दिल्लीकरांना अस्सल देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याची तसेच अन्य कोकणी उत्पादनांची चव चाखायला मिळणार आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे हा आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीतजास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या हेतूने खासदार वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल आणि १ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील खासदार रविंद्र वायकर यांनी आंबा महोत्सवाचे नियोजन करून या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास वेळ दिली आहे. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीतजास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी भेटीदरम्यान व्यक्त केले होते. दिल्लीतील जास्तीतजास्त आंबाप्रेमीनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा तसेच अन्य उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन वायकर यांनी केले आहे.