Homeटॉप स्टोरीअर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेच्या...

अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेच्या अध्यक्षाविनाच?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही सरकारकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांना सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या अधिवेशनात अध्यक्षपदासाठी निवडणकच घेण्यात येणार नाही. कोरोनामुळे सत्ताधारी पक्षांचे अनेक सदस्य व मंत्री अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यातच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना आपले सदस्य फुटण्याची शक्यता वाटते. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधिमंडळाचे कामकाज चालवले जाणार आहे.

फक्त 10 दिवस होणार कामकाज

वाढत्या कोरोनाच्या सावटाखाली होत असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या १० दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. सोमवार दि. 1 मार्च 2021 ते दिनांक 10 मार्च 2021पर्यंत मुंबईत विधान भवन येथे आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचा 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानमंडळाच्या प्रांगणात आज झाली. यावेळी बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आदी उपस्थित होते. 

कोरोनाविषयक काळजी घेणार

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विधानभवनात अधिवेशनाच्या कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांकरिता RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी दि. 27 व 28 फेब्रुवारी, 2021 रोजी तसेच पुढील आठवड्याच्या शनिवार व रविवारी विधान भवन, मुंबई येथे यासंदर्भात कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत कोविड-19 (कोरोना) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता विधान भवनात दि. 01 मार्चपासून निगेटिव्ह प्रेशर सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे.

गर्दी होऊ नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षारक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत खाजगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.

सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशाप्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सभागृहामध्ये विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी यु.जी. यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटींग, प्रवेशद्वाराच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हँडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बाटली देण्यात येणार आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content