Homeटॉप स्टोरीअर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेच्या...

अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेच्या अध्यक्षाविनाच?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही सरकारकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांना सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या अधिवेशनात अध्यक्षपदासाठी निवडणकच घेण्यात येणार नाही. कोरोनामुळे सत्ताधारी पक्षांचे अनेक सदस्य व मंत्री अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यातच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना आपले सदस्य फुटण्याची शक्यता वाटते. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधिमंडळाचे कामकाज चालवले जाणार आहे.

फक्त 10 दिवस होणार कामकाज

वाढत्या कोरोनाच्या सावटाखाली होत असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या १० दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. सोमवार दि. 1 मार्च 2021 ते दिनांक 10 मार्च 2021पर्यंत मुंबईत विधान भवन येथे आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचा 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानमंडळाच्या प्रांगणात आज झाली. यावेळी बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आदी उपस्थित होते. 

कोरोनाविषयक काळजी घेणार

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विधानभवनात अधिवेशनाच्या कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांकरिता RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी दि. 27 व 28 फेब्रुवारी, 2021 रोजी तसेच पुढील आठवड्याच्या शनिवार व रविवारी विधान भवन, मुंबई येथे यासंदर्भात कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत कोविड-19 (कोरोना) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता विधान भवनात दि. 01 मार्चपासून निगेटिव्ह प्रेशर सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे.

गर्दी होऊ नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षारक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत खाजगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.

सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशाप्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सभागृहामध्ये विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी यु.जी. यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटींग, प्रवेशद्वाराच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हँडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बाटली देण्यात येणार आहे.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content