नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे. संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले. हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आज मुंबईत हॅाटेल ग्रॅंड हयात येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
देशातली जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नितीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडिया आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा मिळतील व इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल अशा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
![नरेंद्र मोदी](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2024/05/7637b4c5-3299-4d1a-9a50-57ed2c559fb9-1024x491.jpeg)
काँग्रेसने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतीवरचा जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार, युपीए सरकारने आणलेल्या अन्नसुरक्षा कायद्यानुसार गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मोफत दिले जाईल, असेही खर्गे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १० किलो मोफत धान्य देण्याची योजना नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे यात तथ्य नाही. डॉ. मनमोहन सिंह सरकारने अन्नसुरक्षा कायदा आणला व त्याअंतर्गत ही योजना आहे. भारत अन्नधान्याबाबतीत स्वयंपूर्ण असून गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. युपीए सरकारनेच ही योजना आणली होती.
![नरेंद्र मोदी](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2024/05/080950c7-5b3a-432a-8118-0aed6acd3c87.jpeg)
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झाला आहे आता त्यांना आरएसएसची गरज नाही. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजपा नष्ट करायला निघाला आहे. आरएसएसला १००वे वर्ष धोक्याचे असून भाजपा आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो.
भ्रष्टाचाराचे आरोप करुन बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजपा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल. मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. भाजपाने १० वर्षं महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. आता इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. ४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिनची सुरुवात होणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
![नरेंद्र मोदी](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2024/05/b1bb4890-e2f7-432e-8654-12d96a261a00.jpeg)
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई, आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत आदी उपस्थित होते.