महाराष्ट्रात विधानसभेचे 40 मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत, जेथून मुस्लिम उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मुस्लिमांची संख्या ११.५% आहे हे लक्षात घेऊन 29 ते 30 जागा मुस्लिम समाजाला मिळाल्या पाहिजेत. परंतु मी इतक्या जागा मिळाव्या अशी मागणी करणार नाही. मात्र किमान 20 ते 25 जागांवर मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी तसा विचार केला पाहिजे. यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर काल झालेल्या दिल्ली भेटीत केली.
दलवाई यांनी खर्गे यांच्याबरोबर झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्वापासून डावलण्यात येत असल्याची तक्रार केली. विधान परिषदेची जागा महाराष्ट्रातील काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याला मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु ऐनवेळेला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल आमची तक्रार नाही त्यांना विधान परिषदेचा संपूर्ण कालावधी मिळाला नव्हता हे खरेच आहे. त्याचबरोबर त्या काँग्रेसची अतिशय महत्त्वाची जबाबदारी लीलया पेलणाऱ्या दिवंगतराजीव सातव यांच्या पत्नीही आहेत. त्यामुळे मी याबद्दल तक्रार करणार नाही. परंतु महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
खर्गे यांनी आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ही गोष्ट योग्य असून याचा नक्की विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही दलवाई यांनी दिली.