देशात बालकांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबविण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ५३७ बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडे संबंधित बालकांना सोपविण्यात आले. यामुळे या बालकांना हक्काचे ‘पालक’ व ‘घर’ मिळाले आहे, अशी भावना महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
देशात एकूण कायदेशीर दत्तक बालकांची संख्या ४५१२ इतकी असून यापैकी महाराष्ट्रात एकूण ५३७ बालके कायदेशीररित्या दत्तक घेण्यात आली आहेत. या दत्तक प्रक्रियेद्वारे त्यांना हक्काचे आई-वडील व कुटूंब मिळवून देण्यात आली आहेत. सातत्याने काम करुन दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वलस्थानी आणल्याबद्दल तटकरे यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, संस्था व राज्याच्या दत्तक स्त्रोत संस्थांचे अभिनंदन केले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारीत अधिनियम २०२१ आणि कारा दत्तक नियमावली २०२२च्या अनुषंगाने राज्यात प्रभावीपणे दत्तक प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्रीय दत्तक स्त्रोत संस्था (कारा), नवी दिल्ली यांनी या उल्लेखनीय कामाची दखल घेतली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ६० विशेष दत्तक मान्यताप्राप्त संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून दत्तक पात्र बालकांना कायदेशीर मुक्त घोषित करून त्यांना हक्काचे पालक व कुटूंब मिळवून देण्याचे कार्य केले जाते. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आणि आयुक्त नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.