मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे, राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय)चा उद्देश, वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या अंमलबजावणी कालावधीत, सुमारे 55 लाख मच्छीमार, मत्स्योत्पादक, कामगार, मासे विक्रेते आणि मासेमारी व संलग्न क्रियाकलापातील इतर ग्रामीण/शहरी लोकसंख्येसाठी थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.46 लाख थेट आणि 34.13 लाख अप्रत्यक्ष अशा जवळपास 45.59 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मत्स्य उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ताविषयक माहिती, मूल्यवर्धन, रोग व्यवस्थापन, प्रजाती वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान, मासे आणि इतर मत्स्य उत्पादने टिकवण्यासाठीचे प्रयत्न, कार्यक्षम मत्स्य वाहतूक आणि विपणन सुविधा, अधिक चांगले देशांतर्गत आणि परदेशी धोरण याद्वारे मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे हेदेखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे एकूण 3351 लाभार्थी प्रत्यक्षपणे कार्यरत आहेत आणि सुमारे 1,04,790 अप्रत्यक्षपणे मासेमारी आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

