Homeडेली पल्सदिव्यांगांच्या आशियाई क्रीडा...

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने रचला इतिहास!

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय दिव्यांग क्रीडापटूंनी 29 सुवर्ण पदकांसह एकूण 111 पदके पटकावत, भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पदक तालिकेसह इतिहास रचला आहे.

भारताने यापूर्वी 2010 सालच्या स्पर्धेत 14 पदके जिंकली होती. तर 2014मध्ये 33 आणि 2018मध्ये 72 पदके जिंकली होती. आताच्या क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारताने सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली असून भारत स्पर्धेच्या पदकतालिकेत 5 व्या क्रमांकावर होता. भारताने या वर्षी आपला 303 खेळाडूंचा सर्वात मोठा चमू पाठवला होता, ज्यात 191 पुरुष आणि 112 महिला क्रीडापटूंचा समावेश होता. भारताने मिळवलेल्या एकूण 111 पदकांपैकी 40 म्हणजे पदकसंख्येच्या 36% पदके महिला खेळाडूंनी कमावली आहेत.

या विक्रमी कामगिरीबद्दल बोलताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले की, ही चमकदार कामगिरी आमच्या खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली क्रीडा क्षेत्रातील योग्य धोरणांचे फलित आहे. तळागाळातील खेळाडूंसाठीची खेलो इंडिया योजना असो किंवा सर्वोत्तम खेळाडूंसाठी लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना असो, या योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे पाठबळ आता चांगले परिणाम दाखवत आहे, असे ते म्हणाले.

या स्पर्धेत 8 ‘खेलो इंडिया’ क्रीडापटू आणि 46 ‘टॉप्स’ क्रीडापटू सहभागी झाले आणि 111 पैकी एकूण 38 पदके या क्रीडापटूंनी मिळवली आहेत, हे जाणून तुम्हाला आनंद होईल, असे अनुराग सिंग ठाकूर म्हणाले. 2014 सालच्या तुलनेत क्रीडा अर्थसंकल्पात 3 पट वाढ झाल्याने आम्हाला आमच्या सर्व खेळाडूंना, मग ते प्रशिक्षक असो वा प्रशिक्षण, परदेशी प्रदर्शन, आहार, पायाभूत सुविधा या बाबतीतही चांगले पाठबळ देण्याची क्षमता निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील भारताची ताकद वाढत आहे, हे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच दिव्यांगांसाठीच्या या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि यापूर्वी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा, दिव्यांगांसाठीच्या स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, डेफलिंपिक या स्पर्धांमधील खेळाडूंच्या नेत्रदीपक कामगिरीवरून दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. माननीय पंतप्रधानांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे भारत केवळ चांगली कामगिरी करत नाही तर 2030 मधील युवा ऑलिम्पिक असो किंवा 2036 मधील उन्हाळी ऑलिंपिक असो, या सारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यासही तयार आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content