महाराष्ट्र विधानसभेच्या आता होत असलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे परिवारवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व पक्षांचे प्रमुख आपापल्या परिवाराला जपण्यामध्ये कार्यमग्न राहणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते पक्षाला जपण्यात किती वेळ देतात आणि परिणामी या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. खासकरून ठाकरे तसेच पवार यावेळी आपल्या आप्तेष्टांंच्याच मतदारसंघांत अडकून पडण्याची शक्यता आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार स्वतः निवडणूक लढत आहेl. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचे काका महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार यांच्या सख्ख्या पुतण्याला म्हणजेच युगेंद्र पवार यांना या मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे बारामती विधानसभेची जागा जिंकण्यासाठी स्वतः अजित पवार तसेच शरद पवार दोघेही याच मतदारसंघांवर आपले जास्तीतजास्त लक्ष केंद्रित करणार आहेत.

तशीच परिस्थिती मुंबईतल्या माहीम आणि वरळी विधानसभा मतदारसंघांची आहे. माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही जागा जिंकणे अमित ठाकरेंसाठी आव्हान ठरू शकते. पर्यायाने राज ठाकरे यांना या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

मुंबईतल्याच वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उबाठा गटाकडून उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि या मतदारसंघातले विद्यमान आमदार आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात मनसेने त्यांचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले आहे. याच मतदारसंघातून शिवसेनेकडून खासदार मिलिंद देवरा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची वाट फारशी सोपी राहिलेली नाही. परिणामी शिवसेनेच्या उबाठा गटाकडूनही उद्धव ठाकरे स्वतः या मतदार संघावर लक्ष केंद्रित करतील यात शंका असू नये.

याशिवाय बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या मुलांकडून वा अत्यंत जवळच्या नातलगांकडून निवडणूक लढवली जात असल्यामुळे या पक्षांचे म्होरकेही या विधानसभा निवडणुकीत संबंधित मतदारसंघांवरच लक्ष केंद्र करतील. राहता राहिला प्रश्न तो काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा. यातल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाची परिस्थितीही जवळजवळ प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसारखीच झाली आहे. राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी याच काळात केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना इतरत्र लक्ष केंद्रित करण्याबरोबरच वायनाडवर जरा जास्तच लक्ष द्यावे लागणार आहे.

शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यामुळे शिंदे स्वतः लढवत असलेल्या ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघावर तेही आपल्या वडिलांच्या बरोबरीने लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना राज्यभर प्रचारावर जरा जास्त लक्ष देता येणार आहे.

फक्त भारतीय जनता पार्टी हाच एक असा पक्ष आहे की ज्यांचे प्रमुख नेते मग ते केंद्रातले असोत की राज्यातले कोणत्याही विशिष्ट मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात अडकून राहणार नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आपापल्या परंपरागत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असले तरी या दोन्ही नेत्यांना आपल्या मतदारसंघांबरोबरच संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावेच लागेल आणि त्यादृष्टीने प्रचाराची आखणी करावीच लागेल. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातल्या जनतेवर कोण किती प्रभाव टाकतो हे एक महिन्यानंतर स्पष्ट होणार आहे.