मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा झाला. या वर्षी या महोत्सवात ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली २ व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांनी या दोन्ही व्याख्यानांना उत्तम प्रतिसाद दिला.

उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान झाले. परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत सांगितले. ते म्हणाले की, परिक्रमा ही एकट्याने करायची असते आणि वारी अनेकांना बरोबर घेऊन करायची असते. परिक्रमा कठीण असून परिक्रमा करणाऱ्यांची नितांत श्रद्धा असली तरच नर्मदामैया काळजी घेते असा अनुभव आहे. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला. उदयन् आचार्य यांनी स्वतः ३ वेळा परिक्रमा केली असून आता नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

सुधीर महाबळ यांनी ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीचे आणि परतवारीचे आपले अनुभव कथन केले. शहरात वाढलेल्या त्यांना अत्यंत भाविक असलेल्या खेडुतांबरोबरचे हृद्य अनुभव खूप काही शिकवून गेले असं ते म्हणाले. वारीची पदयात्रा ही अतिशय शिस्तबद्ध आणि आखीव असते. महाबळांनी सांगितलं की, ही या लाखो वारकऱ्यांची स्वयंशिस्त आहे. वारी म्हणजे ऐश्वर्यवारी आणि परतवारी म्हणजे वैराग्यवारी असंही ते सांगतात. ते स्वतः गेली अनेक वर्षं वारी आणि परतवारी श्रद्धापूर्वक करतात.