Homeकल्चर +मुंबईत आजपासून ‘मध...

मुंबईत आजपासून ‘मध महोत्सव’!

महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मधमाशीपालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशीपालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सकाळी झाले. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

मधमाशी केवळ मध व मेण एवढ्यापुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशी हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाची जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशीपालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती, मधमाशीपालन उद्योगाचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येत आहे.

मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेली उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधमाशीपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मध महोत्सवात मधमाशीपालनासाठी लागणारे साहित्य, मधाचे व मधमाशांचे विविध प्रकार व मधापासून तयार होणारी विविध उत्पादने, तसेच सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासून विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

मध महोत्सवाच्या माध्यमातून मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आज, १८ जानेवारीला शेती व मधमाशा पालन, गुणवत्तापूर्ण मध आणि मूल्यवर्धित उत्पादने, १९ जानेवारीला मध व आरोग्य, मधुक्रांतीसाठी महाराष्ट्राचे पाऊल या विषयांवर परिसंवाद होणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचा ‘मधुबन’ हा मधाचा ब्रॅंड आहे. हे दर्जेदार मध २० टक्के सवलतीच्या दराने नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहे असेही साठे म्हणाले. 

महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव, प्रति किलो पाचशे रुपये, देणारे राज्य आहे. त्याचबरोबर मधमाशीपाळांची माहिती संकलन करण्याची योजनासुद्धा राबविण्यात येणार आहे. राज्यात १० गावांची निवड मधाचे गाव यासाठी करण्यात आलेली आहे. डोंगराळ भाग, मध हा पारंपरिक व्यवसाय असणे आणि फुलोरा या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात प्रशिक्षण व  जनजागृती करण्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाय मधमाशीचे विष हे दुर्धर आजारावरसुद्धा उपयुक्त आहे याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रिम प्रोजेक्ट सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना अनुभवता येणार आहे.

राज्यात मधमाशांच्या ५ जाती आहेत. सातेरी, मेरीफेरा, आग्या, फ्लोरिया आणि पोया. यातील सातेरी आणि मेरीफेरा ह्या अंधारात राहणाऱ्या आणि पाळीव मधमाशा आहेत. या मधमाशांची शेती उत्पादन वाढण्यासाठी मदत होते. याच मधमाशीचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाबळेश्वर आणि पश्चिम घाटातील १२ जिल्हे आणि ६३ तालुक्यात सातेरी मधमाशी सापडते. कोकणात पोयाच्या छोट्या मधमाशांचे अस्तित्त्व आढळते, विदर्भात सातेरी तर मराठवाड्यात मेरिफेरा या मधमाशीचे जतन करतात. सूर्यफूल, ओवा, जांभूळ, आग्या माशांचे मध असे विविध प्रकारचे मध या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content