अखेर उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान आमदार रविंद्र वायकर आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काल रात्री उशिरा आमदार वायकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यात वायकर यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या यादीतच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित केली आहे.
लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. पुढे या गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण ही निशाणीही देण्यात आली. मात्र, या काळात गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटातच राहिले. या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी वयोमानामुळे निवडणूक लढविण्यास नकार दिला. तेव्हापासून मुख्यमंत्री शिंदे विजयाची खात्री देणाऱ्या उमेदवाराच्या शोधात होते. अमोल कीर्तिकरांची निष्ठा पाहून उद्धव ठाकरे यांनी पहिल्या यादीतच त्यांची उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी जाहीर केली.

उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले आमदार रविंद्र वायकर यांनी तब्बल दीड वर्षं एकनाथ शिंदे यांना साथ देण्यास नकार दिला. या काळात त्यांच्यामागे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मुंबई महापालिकेने दिलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या प्रयत्नाची पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीही झाली. या चौकशीत अखेर कोणताही आरोप सिद्ध होईपर्यंत पुढे गेला नाही. दरम्यान वायकरांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र यावेळी त्यांची देहबोली ते बळजबरीने शिवसेनेत दाखल होत असल्याची दिसत होती. त्यामुळेच अमोल कीर्तिकरांविरूद्ध त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. त्याचवेळी अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात ईडीने चौकशीचा फेरा वाढवला. कोरोना काळातल्या खिचडी गैरव्यवहारप्रकरणी त्यांची चौकशी सुरू झाली. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी हाच धागा पकडत कीर्तिकरांवर जोरदार टीका सुरू केली. परिणामी त्यांना काँग्रेसमधून सहा वर्षांकरीता निलंबित करण्यात आले. निरूपम आजही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मनःस्थितीत असून ते याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्याही प्रयत्नात आहेत.
गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले रविंद्र वायकर १९९२ ते २०१२पर्यंत मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेमधून चार वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. या काळात ते चार वेळा मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. २००९ सालापासून सतत तीन वेळा ते जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्रीही होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याविषयी विचारणा केली होती. मात्र, तेव्हा त्यांनी यासाठी तयार नसल्याचे सांगितले होते. काल रात्री मात्र वायकर यांनी याकरीता होकार दिला, असे कळते. एक-दोन दिवसांत वायकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणाही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.