काँग्रेसचे नेते राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या दौऱ्याचे नियोजन सिमीसारख्या काही कट्टरपंथी संस्थांच्या सदस्यांशी संबंधित लोकांकडून केले जाते. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या राहुल गांधी यांच्या दौऱ्याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. राहुल गांधी जेव्हाजेव्हा परदेशात असतात तेव्हातेव्हा देशात मोठमोठ्या दुर्घटना कशा काय घडतात, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
आज ठाकरे गटाच्या मुखपत्रातून ओदिशा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेवर टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर गरळ ओकण्यात आली आहे. याच मुखपत्राला एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून जाहिरातरुपी पन्नास लाखांचा धंदा होतो. आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेवर सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. त्याच मुंबई महापालिकेकडून या मुखपत्रासाठी सर्वाधिक जाहिराती मिळत आहेत. सरकारी तुकड्यांवर जगणारे हे लोक कोणत्या तोंडाने नैतिकतेची भाषा वापरतात, असा सवाल त्यांनी केला. या अपघातानंतर त्या ठिकाणाहून पहिली गाडी जाईपर्यंत आमचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी घटनास्थळ सोडले नाही. एखादा आदर्श मंत्री कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
कोविडच्या काळात तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्काळजीपणामुळे ज्यांना जीव गमवावा लागला, त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला का? आदित्य ठाकरे स्वतः तुंबलेल्या पाण्यात उभे राहून पुढच्या वर्षी मुंबईत अशा पद्धतीने पाणी तुंबणार नाही, याची ग्वाही देत होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत पाणी तुंबतेच. तेव्हा नैतिकतेच्या मुद्द्यावर का राजीनामा दिला नाही? याच उद्धव ठाकरेंनी आपण विधान परिषदेचा राजीनामा देतोय, अशी जाहीर घोषणा केली. मग आजपर्यंत त्यांनी का राजीनामा दिला नाही? तेव्हा उगाचच आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवू नका, असे नितेश राणे म्हणाले.
खरी शिवसेना दिल्लीसमोर झुकणार नाही, दिल्लीमध्ये चकरा मारणार नाही, असे यांचे नेते संजय राजाराम राऊत बोलतात. त्यांचे मालक दिल्लीत किती वेळा १० जनपथला गेले होते? ज्यांना भेटत होते त्या राहुलच्या मम्मी होत्या की मातोश्रीच्या मम्मी होत्या? काँग्रेसवर जास्त प्रेम शिवसेनेने दाखवले आहे. अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शरद पवार यांनी कानातून रक्त येईपर्यंत संजय राऊत यांची लायकी काढली. तेव्हापासून दोन दिवस यांची भाषा आवळली आहे आणि फुशारकी कसली मारतात? संजय राऊत किंवा त्यांचे मालक उद्धव ठाकरे शिवसेनेच्या चायनीज मॉडेलचे नेते आहेत. ओरिजनल शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही आमदार राणे म्हणाले.
आमच्या एका इंटरनल सर्व्हेमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे फक्त 22 नगरसेवक निवडून येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन-पाच तर काँग्रेसचे दहा-पंधरा अशी यांची संख्या आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून ही उरलेली सेना निवडणूक लढवणार आहे असेही त्यांनी सांगितले.

