सर्वसामान्य घरातील मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्यातील खेळाडू तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 1988 साली सुरू करण्यात आलेल्या शहाजी राजे क्रीडा संकुलाचा (अंधेरी स्पोर्ट्स क्लब) वापर खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी न करता लग्न समारंभ, इव्हेंट्स व शूटिंगसाठी होत असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केला. तसेच या संकुलाचा कारभार चालवण्यासाठी मे. ललित कला प्रतिष्ठानला दिलेले कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणीदेखिल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच केली.
येथील लग्न समारंभ, इव्हेंट, हॉटेल सर्व बंद करून फक्त आणि फक्त क्रीडा संकुल येथे बनवण्यात यावे. सर्वसामान्य जनतेसाठी आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी हे क्रीडा संकुल सर्व सुविधांसह उपलब्ध करून द्यावे. महापालिकेच्या 14 एकर जागेवर या क्रीडा संकुलाचे खाजगिकरण करून घोटाळे करणाऱ्या संबंधित व्यक्ति व संस्थांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, या क्रीडा संकुलात मल्टिप्लेक्स स्टेडियम होते. क्रिकेट, हँडबॉल, वॉलीबॉल, कबड्डी तसेच इतर मैदानी खेळ खेळले जात होते. आता फक्त फुटबॉल खेळ आहे आणि फक्त फुटबॉलसाठी क्रिकेट, हँडबॉल, वॉलीबॉल, कबड्डी हे खेळ जाणूनबुजून बंद करण्यात आले आहेत. आता फक्त मोठेमोठे लग्न समारंभ, कार्यक्रम, एका राजकीय पक्षाचा कारभार चालतो. डेकोरेटरचा विळखा, त्या माध्यमातून पैशाची कमाई केली जाते. बाहेरून येणाऱ्या खेळाडूंकरिता निवासासाठी ५६ रुमचे खेळाडू वसतिगृह बनवण्यात आले होते. आता त्याचे थ्री स्टार हॉटेल बनवण्यात आले असून त्याठिकाणी ऑनलाईन बुकिंग व्यवस्थाची करण्यात आली आहे. मुंबई मनपाने भाडेपट्टे करारावर दिलेल्या ललित कला प्रतिष्ठानने शहाजीराजे क्रीडा संकुलाचे हॉटेलमध्ये, मॅरेज हॉलमध्ये रूपांतर केले आहे.
सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मॉर्निंग वॉकसाठी केवळ सात ते साडेआठ एवढीच वेळ ठेवली आहे. साडेआठ वाजले की, वॉचमनच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढले जाते. एवढी येथे दादागिरी आहे. तसेच येथे लग्न समारंभ, इव्हेंट असले की, येथे सर्व खेळ बंद ठेवले जातात. या मागणीचे पत्र आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. याबाबत चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला दिले, अशी माहितीही त्यांनी दिली.

