बारामतीचा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केले.

पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर येथील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. भारताला व महाराष्ट्राला विकसित बनवून देशातील सर्व घटकांमधील लोकांना पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल. आपला अजेंडा मान्य असणाऱ्यांना सोबत घेऊन आपण मोदींची ताकद वाढविली पाहिजे. हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारले आहे, असे ते म्हणाले.

मुळशी धरणाचे पाणी दौंड आणि इंदापूर तालुक्यात आणण्याचे तसेच खडकवासला बोगदा पूर्ण करून दरवर्षी 3 टीएमसी पाणी दौंड आणि इंदापूरला आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या ध्येयासाठी काम करून जनतेच्या आशीर्वादाने हा भाग सुजलाम सुफलाम करणार. जनतेच्या समस्यांचे समाधान कृतीमधून झालेले पाहायला मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. राहुल कुल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.