महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी म्हणजेच १२ डिसेंबरला नागपूरला सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांवरही सोमवारी, ११ डिसेंबरला चर्चा होईल.

विधानसभेचे आजचे कामकाज संपण्यापूर्वी तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी अध्यक्षांच्या वतीने ही घोषणा केली. आज सकाळी विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे अनेक सदस्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरही तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी आपण अध्यक्षांशी तसेच संसदीय कार्य मंत्र्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन मी दिले होते. या दोघांशी चर्चा करून मी असे जाहीर करतो की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या विषयावर सोमवारी तर मराठा आरक्षणाच्या विषयावर मंगळवारी चर्चा घेण्यात येईल, असे कुणावार म्हणाले.
त्याआधी अशोक चव्हाण यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित केला होता. एका मंत्र्याने या विषयावर विधानसभेच्या सभागृहात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन जाहीररीत्या दिले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सरकार या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे आणि वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेने या विषयावरील चर्चेसाठी दिवसही निश्चित केला आहे. या सभागृहातील गटनेत्यांशी बोलून अध्यक्षांनी या चर्चेसाठी दिवस निश्चित करावा म्हणजे या विषयावर चर्चा करता येईल. सरकारचीही चर्चा व्हावी, ही भूमिका आहे.

