Homeटॉप स्टोरी‘पर्यटनाला’ आलेल्या सरकारला...

‘पर्यटनाला’ आलेल्या सरकारला सोमवारी काँग्रेस विचारणार जाब! 

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी, ११ डिसेंबरला नागपूरच्या विधानभवनावर धडकणार आहे. विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, आदी सहभागी होणार आहेत.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करुन आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्त्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे NCRBच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा, याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्याला बगल देत आहेत. राज्यात विविध खात्यातील २.५ लाख पदे रिक्त आहेत, पण सरकार नोकरभरती करत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतीक्षा करत आहेत. पण सरकार परिक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नोकरभरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करावीत, कांदा निर्यातबंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा-सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन काँग्रेसचा हा हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content