आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून मुंबईच्या टिळक भवन, या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्व बाजूने विचार केला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असून आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्षही यावेळी उपस्थित राहतील.
भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षांपासून देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने भारताला जगात एक महाशक्ती म्हणून उभे केले. पण नरेंद्र मोदी सरकारने केवळ ९ वर्षांत देशातील सर्व वैभव विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे. जाती-धर्मांमध्ये विष कालवून राजकीय पोळी भाजण्याचे पाप केले जात आहे. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरघोस मतदान करत विजयी केले आहे. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रातही भाजपाला धूळ चारू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

