Homeटॉप स्टोरीधर्माच्या नावावर अर्थसंकल्पही...

धर्माच्या नावावर अर्थसंकल्पही करण्याचा काँग्रेसचा इरादा!

धर्मावर आधारीत देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसला आता धर्माच्या नावावर देशाच्या अर्थसंकल्पाचेही विभाजन करावयाचे असून हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प लागू करण्याचा काँग्रेसचा विचार आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कल्याणच्या जाहीर सभेत केला.

कल्याण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी यावेळी उपस्थित होते.

कल्याणच्या भूमीवर राष्ट्रकल्याणासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. गरीबांचे कल्याण हे आजच्या राजकारणाच्या कसोटीचे मुख्य केंद्र बनले आहे. देशातील 25 कोटी गरीब पहिल्यांदाच गरीबीतून मुक्त झाले आहेत. गरीबांना प्रथमच मोफत पक्की घरे मिळाली आहेत, पहिल्यांदाच प्रत्येक घऱाला नळाद्वारे पाणी देण्याची मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे, प्रत्येक गरीबाकडे आज मोफत आरोग्य सेवेचे गॅरंटी कार्ड आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकार बनल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत काय कामे करायची, कोणते निर्णय घ्यायचे, यावर आम्ही सातत्याने काम केले आहे. आज जेवढी मेहनत करत आहोत, तितकीच मेहनत 4 जूननंतरही करत राहू, म्हणूनच, पुढच्या शंभर दिवसांत काय करायचे याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात आहोत, असे ते म्हणाले.

हा माझ्या आत्मविश्वासाचा मुद्दा नाही, तर जनता जनार्दनाच्या विश्वासाचा आहे. देशाच्या नवयुवकांकडे कल्पकता आहे, नावीन्यपूर्ण काही करण्याची उमेद आहे. त्यामुळे युवकांनी त्यांच्या कल्पना मला पाठवाव्यात, माझ्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमास पुढे 25 दिवस जोडून मी त्यावर काम करेन. देशाचे युवक मला देशाच्या विकासाचे, भविष्याचे नवे विचार देतील. पुढचे चार महिने असा एक भक्कम पाया तयार करणार आहे, त्याद्वारे 2047 च्या विकसित भारताचे माझे संकल्प अधिक दृढतेने पार पाडता येतील. तुमची स्वप्ने हाच माझा संकल्प आहे आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्ये क्षण तुमच्या आणि देशासाठी समर्पित असेल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

गेल्या दहा वर्षात देशाच्या प्रत्येक क्षेत्रात नवी उर्जा, नवा विश्वास, नवी गती प्राप्त झाली आहे. ज्यांनी अनेक पिढ्यांना गरीबी हटाओ च्या घोषणा देत स्वप्ने दाखविली, प्रत्येक निवडणुकीत याच स्वप्नाची अफूची गोळी जनतेस दिली, ज्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार ठरविले, ते लोक देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. जनतेची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत, पुढच्या पिढीचे भविष्य निश्चित करू शकत नाहीत. देशाची ही यशस्वी वाटचाल, गती कायम ठेवून देशाची वाटचाल अशीच पुढे नेण्याचे काम आम्हीच करू शकतो, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

पहिल्या चार टप्प्यांत महाराष्ट्राने काँग्रेस व इंडी आघाडीला चारीमुंड्या चीत केले आहे. आजही काँग्रेस व इंडी आघाडी तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहे. एससी, एसटी ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर त्यांचा डोळा असून कर्नाटकात ज्याप्रमाणे रातोरात मुस्लिमांना ओबीसी बनवून त्यांना आरक्षण बहाल केले, तीच लूट आता संपूर्ण देशात करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, असा आरोपही त्यांनी केला. आता व्होट जिहाद करायला निघालेल्या काँग्रेसला इंडी आघाडीतील एकाही पक्षाने विरोध केला नाही. उलट आम्हीच कर्तव्य म्हणून हा डाव उघड केला आहे. माझ्या प्रतिमेपेक्षा मला माझ्या देशाची एकता महत्वाची आहे. आम्ही त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही पंतप्रधान मोदी यांनी दिला.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content