Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी...

मुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियान

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, १० सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.

आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाची माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ज्यांना लाभ झालाय त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, अशा कुटुंबांचीदेखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. उद्या मुख्यमंत्री लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचे ॲप लाँच होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याला लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

या कुटूंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणांनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीला ३० सप्टेंबर २०२४पर्यंत मुदवाढ दिली आहे. या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव सांगितले. बहिणींना खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणारी ही योजना आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेत अर्ज केले. त्यापैकी १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुंटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे. घराचे बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल. महाराष्ट्र आज उद्योग, इन्फ्रा, कृषी, गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी शासन आपल्या दारी, या योजनेत राज्यातील ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख रुपये इतकी वाढवली. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content