Homeएनसर्कलक्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत भाजपाचे...

क्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत भाजपाचे ‘हर घर तिरंगा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात येत्या 9 ते 15 ऑगस्टदरम्यान म्हणजेच क्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती या अभियानाच्या प्रदेश संयोजक आ. उमा खापरे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरीत करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. राज्यभर लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे असेही त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यदिनाच्या या उत्सवात सामान्य माणसाने अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे या हेतूने हे अभियान आयोजित केले आहे. पक्षाच्या सर्व शक्ती केंद्र व बूथवर राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आपण विदर्भात या अभियानातील कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे खापरे यांनी सांगितले. ठाणे, कोकण, मुंबईसाठी राणी निघोट-द्विवेदी, मराठवाड्यात किरण पाटील, उत्तर महाराष्ट्रात अजय भोळे, प. महाराष्ट्रात सुदर्शन पाटसकर या अभियानाचे सहसंयोजक आहेत, असे त्या म्हणाल्या.

9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. लहान मुलांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

11 ते 14 ऑगस्ट या काळात पक्षसंघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत. या यात्रेमध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती व जमाती मोर्चा तसेच मंडलातील विविध स्थानिक सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे. यात्रेचा समारोप विधानसभा स्तरावर होणार आहे. 12 ते 14 ऑगस्ट या काळात महापुरुष तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक, पुतळा परिसर स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. महापुरुष व स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा पूजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. 14 ऑगस्टला फाळणी विभीषिका स्मृतिदिनानिमित्त फाळणीमुळे प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यांच्या  बलिदानाच्या स्मरणार्थ चर्चासत्रे, संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही खापरे यांनी दिली.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content