Wednesday, February 5, 2025
Homeचिट चॅटमंगळवारपासून प्रो कबड्डीला...

मंगळवारपासून प्रो कबड्डीला साजेसे चढाई-पकडींचे द्वंद्व! 

प्रो कबड्डीचा चढाई-पकडींचा खेळ थांबताच आता मुंबईतल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने १४ अव्वल व्यावसायिक संघांची प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. येत्या मंगळवारी, ५ मार्चपासून ८ मार्चदरम्यान विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डी संघाचा जोरदार संघर्ष कबड्डीप्रेमींना अनुभवायला मिळेल.

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्‍या ८० वर्षांच्या “तरुण तडफदार” स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा विशेष व्यावसायिक गट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाही मंडळाच्या विशेष व्यावसायिक स्पर्धेत गतविजेता भारत पेट्रोलियम, इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), युनियन बँक, मुंबई महानगर पालिका, बँक ऑफ बडोदा, महिंद्रा आणि महिंद्रा, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा बलाढ्य संघांचा दमदार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर अनुभवता येईल.

आगळ्या वेगळ्या बक्षीसांचाही वर्षाव

कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळाने काही हटके बक्षीसेही ठेवली आहेत. यात एकाच चढाईत पाच गुण टिपणारा, सुपर रेडदरम्यान चढाईपटूची दोघांतच यशस्वी पकड करणारे पकडवीर, सामना सुरु होताच पाच मिनीटात प्रतिस्पर्ध्यावर लोण चढवणारा संघ, तसेच एका सामन्यात चढाईचे १५ गुण मिळविणारा चढाईबहाद्दर आणि पकडींचे ७ गुण टिपणारा पकडवीर यांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिस दिले जाणार असल्याची घोषणा मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया-पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे कबड्डीचे अनेक सुपरस्टार प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधीश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊण लाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही २१ हजार रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही सोनसाखळी जिंकेल तर चढाई आणि पकडवीरालाही सोन्याची भेटवस्तू दिली जाणार आहे.

स्पर्धेत एकंदर १४ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे दोन तर चार-चार संघांचे दोन-दोन गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी सहा सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.

कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ

बँक ऑफ इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), रिझर्व्ह बँक (आरबीआय), मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम), अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केट कमिटी (एपीएमसी), युनियन बँक (युबीआय), आयएसपीएल (युवा पलटण), मिडलाईन अ‍ॅकेडमी, संत सोपान सहकारी बँक, न्यू इंडिया ॲश्युरंस, जे एस डब्ल्यू, महिंद्रा आणि महिंद्रा.

Continue reading

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1 एप्रिलपासून होणार खास प्रयत्न

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे....

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...
Skip to content