Homeकल्चर +अभिनयाला लाभली अध्यात्माची...

अभिनयाला लाभली अध्यात्माची जोड..

अभिनय आणि अध्यात्म, याच्या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ‘भैरोबा’, ‘काटा रुते कुणाला’, ‘कन्यादान’, ‘लक्ष’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘माधुरी मिडलक्लास’, ‘क्राईम डायरी’, ‘श्री स्वामी समर्थ’, ‘दूर्वा’, ‘प्रेमास रंग यावे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘सुखी माणसाचा सदरा’ आणि आता नवीन चालू होणारी ‘अंतरपाट’ अशी प्रातिनिधिक नावे घेता येतील.

नाटकांमध्ये ‘अजब तुझे सरकार’, ‘संगीत सन्यस्त खड्ग’ आणि चित्रपटांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’, आगामी ‘दिल मलंगी’ अशा काही मराठी चित्रपटांमध्ये या हरहुन्नरी कलावंताने विविध पैलू असलेल्या अनेक भूमिकांतून रसिकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयासोबतच ते अनेक स्टेज शोंचे निवेदन-सूत्रसंचालनदेखील करतात. यासोबतच ते सत्यनारायण पूजा, सर्व शांती कर्म म्हणजेच पौरोहित्य तसेच श्री स्वामींच्या मठात गुरुजी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट, मालिकांमधून विविध छटा असलेल्या भूमिकांमध्ये ते रसिकांना दिसणार आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद..

प्रश्न: प्रसादजी आपली अभिनय क्षेत्रात सुरुवात कशी झाली? आवड म्हणून कि व्यवसाय म्हणून?

प्रसाद ताटके: अर्थात आवड म्हणून! पण पुढे काही चांगली काम मिळाली आणि हळूहळू अध्यात्मासोबतच अभिनयात रमू लागलो. स्वामीकृपेने सध्या दोन्हीं क्षेत्रांमध्ये काम करीत आहे.

प्रश्न: आपण अभिनय करू शकतो केव्हा समजले? गाॅडफादर कोणाला मानता?

प्रसाद ताटके: हे अभिनयाचे गुण कोंकणवासियांत उपजत आहेत. त्यामुळे लहानपणापासून स्टेजचे आकर्षण कायम होते. गॉडफादर म्हणाल तर मराठीमध्ये उपेंद्र लिमये, सुबोध भावे, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सदाशिव अमरापूरकर, विनय आपटे सर यांसह अनेक दिग्गजांच्या अभिनयाने प्रेरणा मिळत आहे.

प्रश्न: अध्यात्म आणि अभिनय यात निवडायचे झाल्यास कशाची निवड कराल?

प्रसाद ताटके: अध्यात्म आणि अभिनय हे दोन्ही माझे पॅशन आहे. त्यामुळे मी दोन्हीमध्ये रमतो. अभिनयाला अध्यात्माची जोड असेल तर आधिक फायद्याचे होते. अध्यात्मात भाषा, उच्चार, आवाजाचा पोत, सादरीकरण यावर प्रभुत्व गाजवता येते आणि अभिनय कलेसाठी हे महत्त्वाचे असल्याने, मी दोन्ही कलेत पारंगत होण्यासाठी प्रयत्न करत असतो.

प्रश्न: अभिनयात करियर करायचं ठरवलं तेव्हा कोणती आव्हाने समोर होती? त्यांना कसे सामोरे गेलात?

प्रसाद ताटके: सुरूवातीला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आजही आव्हानं समोर आहेतच. पण आता मार्ग थोडा मोकळा होत चाललाय. छान छान भूमिका करायला मिळत आहेत. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचू लागलंय याचा आनंद होतोय.

प्रश्न: आजवरचा या क्षेत्रातील अनुभव कसा होता? आवडीचे काम मिळावण्यासाठी काय काय करावे लागले?

प्रसाद ताटके: आजपर्यंतचा अनुभव खूप छान आहे. इतर कलाकारांना जशी वागणूक सुरूवातीला मिळते तसं माझ्या बाबतीत शक्यतो झाले नाही. यामध्ये अर्थातच माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि मघाशी म्हणालो तसं अध्यात्माची जोड. यामुळे अनेक मालिका, नाटकांमध्ये भूमिका मिळत गेल्या. इतर कलाकारांना जसा त्रास होतो तसा सुदैवाने मला झाला नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे खूप कमी कालावधीत रेस्पेक्ट मिळतोय. जो काही संघर्ष सुरू आहे तो आव्हानात्मक भूमिका मिळविण्यासाठी.

प्रश्न: आजवर तुम्ही कोणकोणत्या भूमिका केल्या?

प्रसाद ताटके: आजवर मी गुरुजी, डॉक्टर, हवालदार, ऑफिस  मॅनेजर, अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’मधील भूमिकेचे विशेष कौतुक झाले आहे. तसेच सुनील परब दिग्दर्शित आणि रमाकांत भोसले यांच्या सद्गुरू एंटरटेनमेण्टच्या ‘दिल मलंगी’मध्ये एक अफलातून भूमिका करत आहे. असे असले तरी मला आगामी काळात निगेटिव्ह भूमिका आव्हानात्मक वाटत असून अशा भूमिका करायला जास्त आनंद होईल.

प्रश्न: केदार शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र शाहीर करतानाचा अनुभव कसा होता?

प्रसाद ताटके: फार छान, वेगळी अनुभूती देणारा. देशासाठी आपल्या पिढीने किती त्यागलंय तो काळ यानिमित्ताने अनुभवायला मिळत होता. केदार शिंदे सर कलावंतांकडून त्यांना हवा असलेला अभिनय सहज करवून घेतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. स्वामीभक्त असल्याने आमच्यात सहज ट्युनिंग जमले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content