मुंबईतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धीरज राठोड यांच्या अधिपत्याखालील हरी ओम परिवाराने डहाणूजवळील मल्याणमधील जिल्हा परिषद शाळेतल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट तसेच शालेय साहित्याचे वाटप केले.
पावसामुळे बऱ्याचवेळा मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. काहीवेळा पावसामुळे भिजून आजारी पडतात आणि मग त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हरी ओम परिवाराने धीरज राठोड यांच्या अधिपत्याखाली मल्याण जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळकरी गरीब मुलांना पेन्सिल, खोडरबरपासून आवश्यक ते शालेय साहित्य तसेच छत्री, रेनकोटचे वितरण केले. हे साहित्य मिळताच या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. हीच आपल्या सामाजिक कार्याची पावती म्हणावी लागेल, असे राठोड यांनी सांगितले.

