Details
राजकारणातील खिलाडूवृत्ती!
18-Apr-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
खिलाडूवृत्ती हा मानवातील दुर्मिळ होत चाललेला गुण आहे. खेळाच्या मैदानावर खिलाडूवृत्ती हवीच हवी. पण राजकारणाच्या आखाड्यातदेखील खिलाडूवृत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीचे राजकारणी सभ्य आणि सुसंस्कृत होते. त्यांच्यात खिलाडूवृत्ती ओतप्रोत भरली होती. दुर्दैवाने अलिकडच्या राजकीय नेत्यांच्याबाबतीत तसे म्हणता येणार नाही. त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप आणि चिखलफेक उबग आणणारी वाटते. अशावेळी एखाद्या मंत्र्यांकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडले की मनापासून आनंद होतो. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवून देशभरातून वाहवा मिळविली आहे.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर 2009 पासून केरळमधून थिरूअनंतपुरम या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. आता ते तिसऱ्यांदा आपले नशीब अजमावीत आहेत. गेल्या मंगळवारी एका मंदिरात धार्मिक विधी करीत असताना ते जखमी झाले. त्यांना थिरूअनंतपुरम येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना हे समजताच त्यांनी इस्पितळात धाव घेतली. उपचार घेत असलेल्या थरूर यांना त्यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुन्हा हे आपण आपल्या मर्जीने केल्याचेही त्यांनी नंतर जाहीर केले. आपल्या पक्षालादेखील आपल्या या कृतीची आपण कल्पना दिली नव्हती, असेदेखील त्या म्हणाल्या. निवडणुकांच्या काळात रोज चिखलफेक होत असताना निर्मलाताईंनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भेटून शुभेच्छा देणे म्हणजे राजकारणाच्या घाणीत त्यांनी गुलाबपाणी शिंपडण्यासारखे आहे.
राजकारणात मतभेद हे चालायचेच. अगदी रक्ताचे नाते असलेले भाऊ-बहीणदेखील राजकीय मतभेदांमुळे दुरावतात. पण त्यामुळे कोणी माणुसकी विसरता कामा नये. महाराष्ट्र हा अशा सुसंस्कृतपणाच्या बाबतीत सदैव आघाडीवर राहिला आहे. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आजारी पडले असता त्यांचे धाकटे चुलत बंधू राज ठाकरे त्यांची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात गेले. इतकेच नव्हे तर ते स्वत: त्यांना मोटारीतून घरी घेऊन आले. उद्धव आणि राज यांच्यातून विस्तव जात नाही, हे सर्वश्रूत आहे. किंबहुना, उद्धव यांच्यामुळेच राज यांना शिवसेना सोडावी लागली, असेदेखील बोलले जाते. पण राजकीय शत्रुत्व असूनही राज ठाकरे रक्ताचे नाते विसरले नाहीत. त्यांच्यातील खिलाडूवृत्ती लोप पावली नाही. राजकारणात अशी उदाहरणे दुर्मिळ असतात. म्हणूनच निर्मला सीतारामन असो अथवा राज ठाकरे असोत, त्यांच्या खिलाडूवृत्तीची करावी तितकी स्तुती कमीच ठरते.
राजकारण म्हणजे सुळावरची पोळी
अर्थात, सर्वच ठिकाणी खिलाडूवृत्ती दर्शविणे राजकीय नेत्यांना परवडणारे नसते. कारण राजकारण म्हणजे सुळावरची पोळी असते. उदा. निवडणुकांच्या काळात एखाद्या पक्षाचा नेता अथवा कार्यकर्ता आपल्या विरोधी पक्षाच्या माणसाला भेटल्यास लोकांच्या भुवया उंचावतात. मग नको त्या अफवा उठतात. नको तो अपप्रचार सुरू होतो. अशावेळी काही काळासाठी का होईना खिलाडूवृत्ती ही खुंटीवर टांगून ठेवावी लागते. पूर्वीचे नेते खिलाडूवृत्तीच्या बाबतीत सुविख्यात होते. उदा. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारच्या विरोधात `पाणीवाल्या बाई’ मृणाल गोरे यांनी अनेकदा आंदोलन केले. त्यांच्यावर भरपूर टीका केली. पण सर्वसामान्य लोकांच्या घरांसाठी मृणालताईंनी दादांकडे भूखंड मागताच दादांनी तो त्यांना पटकन बहाल केला. दादांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पार्थिवाकडे पाहून सरकारी कामगारांचे नेते र. ग. कर्णिक यांना उद्देशून मृणालताई म्हणाल्या, `असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही.’ दादांची सभ्यता, सुसंस्कृतपणा आणि खिलाडूवृत्ती यांना मृणालताईंनी दिलेली ती पावती होती. खिलाडूवृत्तीची अशी पावती वरचेवर पाहयला मिळो ही अपेक्षा!”

