रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा) यांनी केली. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे अतुलनीय योगदान पाहता यंदा 28 जानेवारी 2026 रोजी भरसमुद्रात बोटीमध्ये रक्तदान शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट यांच्या वतीने पद्मभूषण रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम एनएबी पुनर्वसन विभाग, आनंद निकेतन, किंग जॉर्ज इन्फर्मरी, डॉ. ई. मोझेस रोड, मुंबई येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आलोककुमार कासलीवाल (एस कुमार ग्रुप), रविंद्र जैन, प्रीतम आठवले, भाग्यश्री वर्तक, अभिनेता बॉबी वत्स, एड. अशोक यादव, हमीद खान, सीता वेणी, रमाकांत मुंडे, जयश्री ठाकूर, दिनेश परेशा, यशवंत भंडारे, पल्लवी कदम, रॉकी फर्नांडिस, प्रकाश दुपारगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना पत्रकार सुरेश यादव यांनी प्रभावीपणे सादर केली.
रतन टाटा जयंतीच्या दिवशी शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयीनुसार किमान एक तास लाईट बंद ठेवावी. आजही देशाच्या अनेक गावांमध्ये व वस्त्यांमध्ये पुरेशी वीज पोहोचलेली नाही. वीज निर्मितीत सुरूवातीपासूनच टाटांचा मोठा सहभाग असल्याने वाचवलेली वीज इतरांच्या उपयोगी यावी, या हेतूने हा उपक्रम राबवावा, अशी सूचनाही के. रवि यांनी केली.
आलोककुमार कासलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नेत्रहीन व्यक्तींना ‘नेत्रदीपक’ बनवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मोठी शारीरिक क्षमता असते. योग, प्राणायाम, व्यायाम व संतुलित आहाराच्या माध्यमातून ती क्षमता सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण हॉस्पिटलचा खर्च करण्यापेक्षा योग्य नियोजन केल्यास आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम राहू शकतो. याप्रसंगी अंध प्रशिक्षणार्थींच्या कलाकौशल्य प्रशिक्षणासाठी भाग्यश्री वर्तक (वर्तक ताई) यांनी ₹ 10,000 रुपयांचा निधी देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली.

