महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले जात आहेत. लाभार्थी स्वतःही आयुष्मान ॲप किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करू शकतात. कार्डनिर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
एकत्रित योजनेअंतर्गत प्रतिकुटूंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयांच्या मर्यादेत 1356 उपचारपद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशनकार्डधारक कुटूंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.