Homeन्यूज अँड व्ह्यूजहालचाल अधिक तर...

हालचाल अधिक तर मेंदू तल्लख…

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आपण घेत असलेला श्वासोच्छवास आणि शरीराची हालचाल यावर अवलंबून असते हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यासाठी दररोज किती चालावे, किती काळ व्यायाम करावा, किती काळ झोप घेणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टीही आता बहुतेक सर्वांना परिचित आहेत. हालचाल आणि रक्ताभिसरण यांचा जसा संबंध आहे तसाच रक्ताभिसरण आणि मेंदू यांचाही संबंध असतो. त्यामुळे दररोज काही ठराविक काळ जलद चालणे, नदीच्या वाहत्या अथवा स्विमिंग पूलच्या पाण्यात काही काळ पोहणे किंवा शरीर साथ देत असेल तर आपल्या इमारतीभोवती धावण्याचा सराव अथवा व्यायाम करण्यामुळे जर तुमच्या हृदयाचे ठोके मर्यादित प्रमाणात वाढत असतील तर तुमच्या मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही त्याची मदत होते असा निष्कर्ष दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने केलेल्या एका नव्या संशोधनातून निघाला आहे.

हा संशोधन प्रकल्प अमेरिकेतील एका आरोग्य संशोधन संस्थेतर्फे प्रायोजित केला गेला होता. त्यात प्राथमिकतेने असे दिसून आले की मध्यम ते अधिक अशी परंतु जोमदार शारीरिक कृती केली गेली तर त्यामुळे मेंदूमध्ये माहितीवर होणाऱ्या प्रक्रियेची गती अधिक होते आणि यामधून विशेषत: मध्यम आणि अधिक वयाच्या लोकांमध्ये त्याची स्मरणशक्ती आणि काम करण्याची ऊर्जा अधिक चांगली होऊ शकते. कोणताही शारीरिक व्यायाम करीत नसलेल्या मंडळींनी जेव्हा अशाप्रकारे शारीरिक हालचाल अथवा व्यायाम करायला सुरुवात केली तेव्हा केवळ पाच मिनिटे ही कृती केल्यानंतरदेखील सकारात्मक परिणाम बघायला मिळाला.

या संशोधनाचा भाग म्हणून ६७ ते ८० वर्षे वयाच्या ५८५ लोकांची तपासणी केली गेली. त्यात त्यांची झोप, दिवसभरात एकाच जागी बसून राहण्याचा कालावधी, हलकी शारीरिक कृती तसेच मध्यम ते अधिक व्यायामाचा कालावधी यांची माहिती नोंदवली गेली. त्यासोबतच काही प्रश्नोत्तरातून त्यांच्या आकलनशक्तीची चाचणी घेतली गेली. या सर्वातून ‘जलद श्वासोच्छवास कारायला लावणारी शारीरिक हालचाल आणि मेंदूचे आरोग्य यांचा संबंध असल्याचे दिसून आले. अधिक व्यायाम केलात तर मेंदूचे आरोग्य सुधारते असा निष्कर्ष निघाला. याबद्दल बोलताना विद्यापीठाचे संशोधक डॉ. मॅडिसन म्हणाले की, तुमच्या रोजच्या दिनक्रमात जारी असा थोडासा बदल करता आला तर त्याचे तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर निश्चित असे सकारात्त्मक परिणाम दिसतील. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत झोप, बसून राहण्याचा कालावधी आणि शारीरिक कृती असे तीन प्रमुख घटक असतात. यांचा एकमेकांशी असणारा संबंध आणि प्रतिसाद यावर आपले आरोग्य ठरते.

उदाहरणादाखल असे म्हणता येईल की, ज्यादिवशी आपल्या कामामुळे शारीरिक थकवा आल्याचे दिसते त्यादिवशी झोप चागली लागते आणि दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी तुम्हाला उर्जावान आहोत असे वाटेल. पण नेमका किती वेळ कोणत्या घटकासाठी खर्च करावा याचे उत्तर मात्र सुरुवातीला प्रत्येकालाच शोधून बघावे लागेल. संशोधनाचा एक भाग म्हणून असेही दिसले की हे व्यायाम कमी तीव्रतेचे असतील तर मिळणारे सकारात्मक परिणाम त्यामानाने कमी होणार आहेत. संशोधनातील निष्कर्ष प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगताना डॉ. ऑड्रे कॉलिन्स एक खास सूचना देत आहेत. दिवसाचे २४ तास असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक दिवसाचा वेळ आपण वरील तीन घटकांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटून देऊ शकता. किमान आठ तास तर झोपेत जाणार आहेत असे धरून उरलेल्या १६ तासांची स्वत:साठी विभागणी करता येईल. लक्षात ठेवायचे ते एकच की व्यायाम अथवा शारीरिक हालचाल यांना प्राथमिकता दिली तर मेंदूचे आरोग्य आणि पर्यायाने तुमचे उतारवयातील परावलंबी होणे कमी होऊ शकेल. आरोग्य ही धनसंपदा आहे असे म्हणतात ते उगाच नाही!

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

लक्षात घ्या.. पाण्याचा जीव गुदमरतोय!

आधुनिक विज्ञान असे सांगते की, ताजे पाणी तसेच प्राणवायू यांचे एक जागतिक जलचक्र असते. जलचक्र अनेकांना नद्या, पाण्याचे प्रवाह, सरोवरे आणि तलाव ही केवळ सृष्टीची सुंदरता दाखवणारे भाग नसून ते पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे मान्य केले गेले...

शर्ट किंवा पँटच्या खिशात ठेवू नका मोबाईल!

एकीकडे मोबाईल फोनने क्रांती करायला सुरुवात केली आणि शहरात तर उंच इमारतींवर मोबाईल संवाद चांगला पोहोचावा यासाठी आवश्यक असे मोबाईल टॉवर दिसायला सुरुवात झाली. मोबाईल आले तेव्हाच लोकांच्या मनात त्यामुळे होणारे उत्सर्जन आणि त्याचे दुष्परिणाम यावर चर्चा घडू लागल्या...

सावधान! राग दाबणेही ठरू शकते आरोग्याला हानिकारक!!

राग येणे हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार असतो हे मान्य करावे लागेल. कारण प्रत्येक माणसाला कधी ना कधी तरी राग येतोच. महान असो की लहान, यापैकी प्रत्येकाला राग येत असतो. त्यातून काय फायदेतोटे आहेत किंवा असू शकतात हे आपण बघणार...
Skip to content