Homeबॅक पेजआंबेकर स्मृती कबड्डी...

आंबेकर स्मृती कबड्डी स्वामी समर्थ, शिवशक्ती आणि विजय क्लबला जेतेपद

मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 35-30 असा पराभव करत जेतेपद पटकावले. पुरुषांच्या स्थानिक गटात विजय क्लबने जय भारत क्रीडा संघाचा पराभव करत बाजी मारली तर व्यावसायिक गटात स्वामी समर्थने रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबचा 34 -32 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाने कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात कबड्डीप्रेमींना ठराविक सामन्यांचा मनमुराद आनंद लुटता आला. महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाला जेतेपद पटकावताना डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबशी कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला शिवशक्तीकडे 20-16 अशी चार गुणांची आघाडी होती. दुसऱ्या सत्रात शिरोडकरच्या चढाईपटूंनी जोरदार संघर्ष करत शिवशक्तीशी बरोबरी साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र ते थोडक्यात अपयशी ठरले आणि शिवशक्तीने 35-30 असा विजय मिळवत आपल्या जेतेपदांची मालिका कायम राखली. शिरोडकरच्या मेघा कदमला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा तर शिवशक्तीच्या पौर्णिमा झेंडे आणि प्रतीक्षा तांडेल यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट पकडपटू आणि सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

व्यावसायिक गटात स्वामी समर्थ आणि रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लब यांच्यातला अंतिम सामनाही अत्यंत चुरशीचा झाला. या लढतीत रिझर्व बँक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मध्यंतराला 13-11 अशी दोन गुणांची आघाडी आपल्याकडे राखली होती. मात्र दुसऱ्या सत्रात स्वामी समर्थच्या चढाईबहाद्दरांनी वेगवान खेळ करत आधी बरोबरी साधली आणि नंतर आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम राखत जेतेपदही पटकावले. त्यांनी हा संघर्ष 34-32 असा जिंकला. स्वामी समर्थचा यश चोरगे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईपटू आणि पकडविराचा मान दीपक सांगळे आणि रुपेश साळुंखे यांनी मिळवला.

पुरुषांच्या स्थानिक गटात मात्र विजय क्लब आणि जय भारत क्रीडा संघात झालेला अंतिम सामना अत्यंत एकतर्फी झाला. विजय क्लबच्या खेळाडूंनी प्रारंभीच पल्लेदार चढाई करत 17-5 अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले. दुसऱ्या सत्रातही जय भारतच्या खेळाडूंचे काहीही चालू शकले नाही. परिणामतः विजय क्लबने ही लढाई 27-13 अशी सहज जिंकली. विजय क्लबचा अक्षय सोनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. जयवादाचा दीपेश पाटील आणि एस एस जीचा ओमकार थोटे सर्वोत्कृष्ट चढाई आणि पकडवीर ठरला.

स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, आमदार महेश सावंत, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनिल बोरकर
यांच्या उपस्थितीत पार पडला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content