राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद पटकाविणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या दीड वर्षातच महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसण्याचे संकेत देण्यास सुरूवात केली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
येत्या वर्षभरात राज्यात होऊ घातलेल्या मिनी विधानसभा निवडणुकांसाठी युती वा महाविकास आघाडीच्या भरवशावर न राहता स्वबळाची तयारी करा, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना बळकट करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका. त्याचा निर्णय आम्ही करू, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेव्हाही अशाच प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करायला सांगत होते. नंतर त्यांनी युतीत निवडणूक लढून पुढे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर मोट बांधली व सत्ता हस्तगत केली. आताही ठाकरे महाविकास आघाडीबाबत हीच भूमिका घेत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
पुढच्या वर्षात राज्यातल्या २० महापालिका, ३०० नगरपालिका, २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका (मिनी विधानसभा) होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना १२ ते २४ जुलै या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्यास सांगितले. यावेळी खासदार अनिल देसाईही उपस्थित होते. बैठकीनंतर देसाई यांनीच प्रसारमाध्यमांना शिवसंपर्क मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
जनतेची कामे करा. आपला पक्ष बळकट करा. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही याकडे लक्ष ठेवा. प्रत्येक गाव कोरोनामुक्त होत आहे की नाही ते पाहा. लसीकरण होते की नाही, याची खातरजमा करा. यात विधानसभा, तालुका आणि पंचायतनिहाय कामे करणे अपेक्षित आहे. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर द्या, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त कामे करा. शिवसेना ही आपली जबाबदारी आहे. १९६६पासून आतापर्यंत आपण कशाप्रकारे आलो हे जाणून घ्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घराघरात कसा पोहोचेल हे पाहा. निवडणुका येतील आणि जातील. मात्र, लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.