Homeहेल्थ इज वेल्थकर्करोगाचे 70 टक्के...

कर्करोगाचे 70 टक्के प्रकार टाळणे शक्य!

भारतीय टपाल खाते, मुंबई विभाग यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने कर्करोगासाठी विशेष पाकीट काल जारी केले. जागतिक कर्करोग दिन-2021 निमित्ताने या आजाराबद्दल जागृती करणे व लोकांना त्यांच्या आरोग्याला असणारा कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी सहकार्य करणे ही यामागील उद्दिष्टे होती.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र ए. बडवे, मुंबई आणि  गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अगरवाल तसेच  भारतीय टपाल खात्याच्या  मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांनी हे विशेष कव्हर जारी केले. कर्करोगाच्या विविध 100 प्रकारांपैकी 70 प्रकार टाळता येण्याजोगे असतात व या आजाराच्या या गोष्टीबाबत जागृती करणे आवश्यक आहे अशी माहिती डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी दिली.

भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढीला  लागले आहे. हे प्रमाण शहरात एक लाख लोकसंख्येमागे 100, निमशहरी भागात एक लाख लोकसंख्येमागे 60 ते 70 तर ग्रामीण भागात 40 ते 50 रोगग्रस्त असे आहे. आपण शहरीकरणाची किंमत अशाप्रकारे चुकवत असतो, असे सांगून टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक म्हणाले की, शहरीकरणासोबत येणाऱ्या आरामदायक जीवनशैलीद्वारे आपण कर्करोगाला आमंत्रण देत असतो आणि त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो यावर अभ्यास झालेला आहे.

तंबाखूसेवन आणि लठ्ठपणा या दोन बाबी या जीवघेण्या आजाराला कारणीभूत आहेत. कर्करोगग्रस्तांनी उपचारानंतरही पाच वर्षांपर्यंत नियमित तपासणी करून घेत राहणे आवश्यक असल्याचे डॉ. बडवे यांनी नमूद केले. देशभरात पसरलेल्या विस्तीर्ण टपाल खात्याच्या जाळ्याचे देशातील कर्करोग उपचारामधील लक्षवेधी सहयोगाबद्दल सांगताना डॉ. बडवे यांनी, पूर्वी दुर्गम व ग्रामीण भागातील रूग्ण उपचारानंतरच्या तपासणीसाठी डॉक्टरांना पत्र पाठवत असत याचा उल्लेख केला.

कर्करोगाचे निदान व तपासणी, उपचारानंतरची नियमित तपासणी  याबद्दल  टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागीय कर्मचाऱ्यांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबियांमध्ये जागृती करण्यासाठी टाटा मेमोरियलच्या सहयोगाने मोहीम सुरू करणार असल्याचे मुंबई व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल  एच. सी. अगरवाल यांनी सांगितले.  ही मोहीम मुंबईपासून सुरू होईल.

कर्करोगाशी लढा देण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना असणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी सांगितले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयोगटातील कर्करोगमुक्त सहभागी झाले होते. या रोगाशी झुंज घेतानाचे आपले अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content