
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या शुक्रवारी, 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास काल सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 65 मतदानकेंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 267 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह काल सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहोचविण्यात येत आहे.
