Homeहेल्थ इज वेल्थजनआरोग्य योजनेत आता...

जनआरोग्य योजनेत आता होणार २३९९ उपचार

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या आता १,३५६वरून २,३९९पर्यंत वाढविण्यात येणार आहे. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

या एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याकरीता गठित राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेची बैठक वर्षा, या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, म. फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या प्रमुख उद्दिष्टपूर्तीचे तसेच योजनेतील उपचारांच्या यादीत सुधारणेसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालाचे सादरीकरण केले.

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या दोन्ही योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयाची तालुकानिहाय मॅपिंग करावे. संबंधित तालुक्यात ३० खाटांचे एकही रुग्णालय नसल्यास अशा ठिकाणी उपलब्ध असलेल्या रुग्णालयात योजनेचा लाभ देऊन त्यांच्या देयकाच्या अदागीची वेगळी व्यवस्था निर्माण करावी. तसेच अशा तालुक्यामध्ये ३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी खासगी रुग्णालयांना आमंत्रित करून सुविधा द्याव्यात. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

ॲप तयार करून चॅटबॉटद्वारे योजनेची माहिती द्या

जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांना त्यांची देयके वेळेत देण्यात यावीत, जेणेकरून ती रुग्णालये रुग्णांना दर्जेदार उपचार देतील. तसेच या योजनेतील उपचार, रुग्णालये, लाभ यांची माहिती मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप तयार करावे. त्यामध्ये चॅटबॉटद्वारे सर्व माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने गेल्या सहा महिन्यात अत्यंत गतीने कामात सुधारणा करून उत्तम काम केले आहे. योजनेच्या अंमलाबजावणीसाठी अधिक गतीने व पारदर्शकपणे काम करावे, जेणेकरून पुढील काळात देशातील पहिल्या तीनमध्ये राज्याचा क्रमांक येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी वेगळा कॉर्पस निधी उभारण्याचा व या निधीतून हृदयप्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण आदी यासह नऊ विविध उपचारांची शिफारस यावेळी मान्य करण्यात आली.

महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उपचारांच्या मंजुरीस लागणारा वेळ कमी करावा, तसेच दोन्ही योजनेचा लाभ कोणत्या रुग्णालयांमध्ये मिळतो, कोणकोणते उपचार मिळतात, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावी. ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी खाटांची मर्यादा कमी करून २०पेक्षा कमी खाटा असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत करावा. या योजनेसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएमएस प्रणालीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय निधीशी जोडण्यात यावी. आदिवासीबहुल भागात उपचारांच्या निकषामध्ये शिथिलता देण्यात यावी. तसेच आधुनिक उपचारांचा समावेश योजनेत करावे, अशा सूचना यावेळी मंत्री शिरसाट, तटकरे व आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शेटे यांनी यावेळी केल्या.

आजच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

– महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत आता २,३९९ उपचारांवर मिळणार वैद्यकीय उपचार

– प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करता येऊ शकतील अशा २५ उपचारांचा योजनेत समावेश

– सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे योजनेत समाविष्ट करण्यात येणार

– उपचारांच्या दरनिश्चितीला मान्यता

– वैद्यकीय उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्यास मान्यता

– रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्रधारक रुग्णालयांना आणि आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अधिकची रक्कम देण्यात येणार.

– योजनेंतर्गत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, नगरविकास विभाग यांच्या रुग्णालयांच्या सहभाग वाढविण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात येणार

– समग्र यादीतील राज्याचे ४३८ उपचार टीएमएस २.० प्रणालीशी सुसंगत करण्यात येणार

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content