Details
वारसाहक्क नियोजन म्हणजेच Succession Planning
08-Jun-2019
| 0
”
विनायक कुळकर्णी ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेशक
vvskul@yahoo.com
वारसाहक्क नियोजनामध्ये दोन प्रकारच्या व्यक्तींचा संच अंतर्भूत असतो– एक असतो संपत्तीचा निर्माता किंवा मालक तर दुसरा असतो त्या संपत्तीचा स्वीकार करणारा. संपत्ती निर्मात्याचे किंवा मालकाचा स्पष्ट हेतू आणि तत्त्वज्ञान, हेच वारसाहक्क नियोजनाच्या पायाचे महत्त्वाचे घटक असतात. वारसाहक्क नियोजन ही एका रात्रीत करता येणारी बाब नसून पूर्ण विचारांती आणि योग्य कागदपत्राद्वारे योग्य कृतीने करण्याची प्रक्रिया आहे. जितकी संपत्ती अधिक आणि वैविध्यपूर्ण असेल तेवढे वारसाहक्क अधिक जटील आणि गुंतागुंतीचे असते. म्हणून या क्षेत्रातील व्यावसायिक सल्लागारांच्या [या क्षेत्रातील अनुभवी वकील आणि किंवा सनदी लेखापाल– चार्टर्ड अकौटंट] सहाय्याने ही प्रक्रिया राबवणे योग्य ठरते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत मोकळेपणाने आणि खुला असलेला संवाद वारसांशी साधून त्याची मते जाणून घेऊन, नात्यांमधील विद्यमान किंवा संभाव्य तेढ लक्षात घेऊन कुटूंबप्रमुख या नात्याने संतुलित निर्णयाकडे जाणे आवश्यक ठरते. दोन पिढीतील अंतर पुसता आले नाही, तरीही किमान नाती तुटणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक ठरते. निष्पक्षपणे विचार करण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची वेळ याचवेळी स्वत:ला अनुभवण्यास येते. वारसाहक्क नियोजनचे प्राथमिक उद्दीष्ट म्हणजे कुटुंबात शांती, समाधान आणि एकात्मता राहिली पाहिजे.
वारसाहक्क नियोजनासाठी निश्चित असे सूत्र नाही पण व्यक्तीगणिक किंवा कुटुंबगणिक ते ठरवले जात असते. वारसाहक्क नियोजनात मध्यस्थ म्हणून नेमक्या व्यक्तीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हा मध्यस्थ वकील आणि किंवा सनदी लेखापाल असल्यास सर्वात उत्तम. वारसाहक्क नियोजनाचे कायदेशीर तांत्रिक ज्ञान आणि करविषयक असलेली नेमकी जाण इथे आवश्यक ठरते. मध्यस्थाने कुटुंबातील व्यक्तीचे समज-गैरसमज लक्षात घेऊन वादावादी टाळून वारसाहक्क नियोजन अंमलात आणण्याचा दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे.
आपले नेमके वारस कोण हे वेळीच ओळखून, फार नजिकच्या भविष्यात होणारी लग्नं, बारशी, घटस्फोट, मृत्यू, पुनर्विवाह या घटना आणि प्रसंगाचा विचार होऊन तद्अनुषंगाने बदलणारी नाती आणि नातेसंबंध लक्षात घेऊन नेमके वारसदार निश्चित केले पाहिजेत. लिव्ह-इनमध्ये असलेले संबंध, आधीच्या विवाहापासून असलेले अपत्य, परित्यक्ता इत्यादी बाबींमुळे नेमका वारसदार निश्चित करणे आवश्यक ठरते. एकीकडे वारसांची गणती आणि जपणूक निश्चित करतानाच दुसरीकडे आपल्या संपत्तीच्या / स्थावर जंगम मालमत्तेच्या / उद्योगधंदा – व्यवसायाच्या घटकांची यादी करणे क्रमप्राप्त असते. सर्व प्रकारच्या स्थावर जंगम मालमत्तांचे, संपत्तीचे आणि उद्योग-व्यवसायाचे विद्यमान मूल्यांकन करून घेणे आवश्यक ठरते. एकीकडे वारसदारांची प्रत्येकी हिश्श्याची टक्केवारी निश्चित करताना उद्योग व्यवसायातील हिश्श्याबरोबरच अनुभव आणि जबाबदारी सांभाळण्याची पात्रता लक्षात घेऊन ती ती पदे कोणी स्वीकारावीत याचेही स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक ठरते. (अर्थात असलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लक्षात घेऊनच पदभाराचे निर्णय सहमतीने घेता आले तर सोन्याहून पिवळे.) त्यासाठी आवश्यक कोणत्या मालमत्ता / संपत्ती भेट द्यायची, कोणत्या मालमत्ता /संपदा विकायच्या, कोणत्या मालमत्तेचे / कंपन्याचे विलीनीकरण / वेगळे करायचे, कोणत्या मालमत्तेसाठी कौटुंबिक व्यवस्था निर्माण करायची, कोणत्या मालमत्तेसाठी किंवा एकूणच संपत्तीसाठी ट्रस्ट स्थापन करायचा, हा ट्रस्ट खाजगी स्वरूपाचा ठेवायचा कि सार्वजनिक करायचा इत्यादी सर्व प्रश्नांचे किंवा शंकांचे जोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या योग्य आणि समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत वारसाहक्काचे नियोजन घिसाडघाईने अजिबात करू नये.”

