Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“कोरोनामुळे आज सार्वजनिक जीवनात वावरताना परस्परांपासून दोन मीटर अंतर राखणे, ही काळाची गरज झाली आहे. त्याचवेळी या कोरोनाने कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे कामसुद्धा केले आहे. मात्र इतका दीर्घ काळ एकत्र राहायचे, कसे राहायचे, वेळ कसा घालवायचा, प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवता येईल? खरे तर अनेक कुटुंबांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले आणि त्याचे कारण होते, प्रत्येक कुटुंबात चालत आलेल्या परंपरा आणि संस्कारांची कमतरता. असे वाटते आहे की अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यामध्ये यापैकी काहीच शिल्लक नाही आणि त्यामुळे, त्या अभावामुळे संकटाचा हा काळ व्यतित करणे, काही कुटुंबांना थोडे कठीण जाते आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.”
“मन की बात, या आकाशवाणीवरून रविवारी प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक कुटुंबात वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती गोष्टी सांगत असत आणि घराला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देत असत. आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच झाली असेल, असे ते म्हणाले.”
“अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला. मानवी संस्कृतीइतकाच कथा-कहाण्यांचा इतिहास जुना आहे. गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, व्यक्त होते. गोष्टीची खरी ताकत अनुभवायची असेल तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते, तेव्हा निरीक्षण करा. मी आयुष्यात दीर्घकाळ परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो. भटकंती करणे हेच माझे आयुष्य होते. रोज नवे गाव, नवी माणसे, नवी कुटुंबे. या कुटुंबांसोबत मी राहत असे, तेव्हा मी तेथील बालकांसोबत गप्पा मारत असे आणि बरेचदा त्या बालकांना सांगत असे- चला, आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू.. त्यांची उत्तरे ऐकून मला आश्चर्य वाटे. मुले मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही किस्सा सांगतो. आणि ती मुले मलासुद्धा किस्सा सांगण्याचाच आग्रह करत असत. म्हणजेच गोष्ट या प्रकाराशी त्यांचा परिचयच नव्हता आणि त्यांचे अवघे आयुष्य अशा किश्श्यांनीच समृद्ध झाले होते, असे पंतप्रधान म्हणाले.”
“भारताला गोष्ट सांगण्याची किंवा किस्से सांगण्याची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत, जिथे हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा चालत आली आहे. विवेक आणि बुद्धिमत्ता यांचे महत्त्व पटवून द्यावे, यासाठी आमच्या गोष्टींमध्ये पशुपक्षी आणि पऱ्यांचे काल्पनिक विश्व रचले गेले. या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. धार्मिक गोष्टी सांगण्याची ही प्राचीन पद्धत आहे. यात ‘कथाकालक्षेवम’सुद्धा समाविष्ट आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या लोककथासुद्धा प्रचलित आहेत. तमिळनाडू आणि केरळमध्ये अतिशय रोचक पद्धतीने गोष्ट सांगितली जाते. या पद्धतीला ‘विल्लू पाट’ असे म्हटले जाते. गोष्ट आणि संगीत यांचा सुंदर मेळ या पद्धतीत अनुभवायला मिळतो. भारतात कठपुतळी हीसुद्धा पारंपारिक कला आहे. अलीकडच्या काळात विज्ञान आणि विज्ञान संबंधित काल्पनिक कथा तसेच कथा सांगण्याच्या पद्धती लोकप्रिय होत आहेत. Gathastory.in सारख्या काही संकेतस्थळाबद्दलसुद्धा मला माहिती मिळाली, जिथे इतरांसोबत अमर व्यास यांच्या कथाही उपलब्ध आहेत, वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्यासारखे अनेकजण मराठी भाषेतसुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी सांगितले.”
“चेन्नई येथील श्रीविद्या आणि राघवनसुद्धा आपल्या संस्कृतीशी संबंधित कथांचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर कथालय आणि The Indian storytelling network ही दोन संकेतस्थळेसुद्धा या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत. गीता रामानुजन यांनी kathalaya.org मध्ये कथा संकलित केल्या आहेत तर The Indian storytelling network च्या माध्यमातून कथाकार यांचे एक जाळे तयार केले जाते आहे. बेंगळुरूमध्ये विक्रम श्रीधर नावाचे एक गृहस्थ आहेत, जे बापूंशी संबंधित कथा उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात. त्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक लोक या क्षेत्रात काम करत असतील. आपण समाज माध्यमांवर त्यांच्या बाबतच्या माहितीची देवाण-घेवाण अवश्य करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.”
“घरात दर आठवड्याला कथांसाठी थोडासा वेळ काढा. आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक आठवड्यासाठी, एक विषय निश्चित करू शकता. कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्या आठवड्यात त्या एकाच विषयावर आधारित वेगवेगळ्या कथा शोधाव्यात आणि कुटुंबातील प्रत्येकाने त्या एका विषयाशी संबंधित एक एक गोष्ट सांगावी. बघता-बघता कुटुंबात अशा कथांचा एक मोठाच खजिना तयार होईल, संशोधनाचे एक उत्तम कार्य होऊन जाईल. सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि संपूर्ण कुटुंबाला एक नवी ऊर्जा मिळेल. आपण स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण करणार आहोत. आपण आपल्या कथांच्या माध्यमातून गुलामगिरीच्या काळातील सर्व प्रेरक घटनांचा प्रचार करू शकतो. विशेषतः 1857 ते 1947 या कालावधीतील प्रत्येक लहानमोठ्या घटनेचा परिचय आता आपण आपल्या नव्या पिढीला करून देऊ शकतो, असेही ते म्हणाले.”

