Details
निरुपयोगी आशीर्वाद!
15-Feb-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
राजकारण म्हटले की, ढोंग, थापेबाजी, दगलबाजी, बदमाषी, कृतघ्नपणा आदी सारे आलेच. किंबहुना, हे सर्व `गुण’ ज्याच्यात असतात, तोच यशस्वी राजकारणी बनू शकतो. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे, माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत केलेले विधान पाहयला हवे. आयुष्यभर समाजवादी विचारांशी जोडले गेलेले मुलायमसिंह यादव परवा काय म्हणाले? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, `प्रधानमंत्री पुन्हा प्रधानमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे.’ मुलायमसिंह यांच्या या विधानाला पंतप्रधानांसह सर्व सत्ताधारी सदस्यांनी दाद दिली.
देशात एकीकडे सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात एकत्र आले असता मुलायमसिंह यांनी असे विधान करावे, याचे अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण मुलायमसिंह यांचा इतिहास पाहता त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. मुलायमसिंह हे सदैव सरड्याप्रमाणे रंग बदलत आले आहेत. त्यांच्या भूतकाळावर नजर टाकल्यास याची कल्पना येते. आझमगड येथून लोकसभेवर निवडून गेलेले मुलायमसिंह समाजवादी पक्षाचे नेते आहेत. ते तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 1996 ते 1998 या दोन वर्षांत ते देशाचे संरक्षण मंत्री होते. 1990 साली चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वाखाली जनता दल पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या मदतीने 1990 साली ते प्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तथापि, 1991 साली चंद्रशेखर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह यांचे सरकारदेखील कोसळले. त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुलायमसिंह यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. परंतु मुरब्बी राजकारणी असलेले मुलायमसिंह स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली. मग बहुजन समाज पार्टीशी हातमिळवणी करून नोव्हेंबर 1993 मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. तथापि, 1995 मध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांचे पर्यावसान या दोन पक्षांची आघाडी तुटण्यात झाले. बहुजन समाज पार्टीने मुलायम सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यातच समाजवादी पार्टीच्या गुंडांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर सर्किट हाऊसमध्ये हल्ला चढविला. तथापि, त्या सुदैवाने बचावल्या.
2002 मध्ये मुलायमसिंह यांनी पुन्हा मायावती यांच्याशी हातमिळवणी करून 2003 च्या निवडणुका जिंकल्या. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. दरम्यान, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी बाबरी मशिद वाचविली. तेव्हापासून ते मुसलमानांचे मसिहा म्हणून ओळखले जाऊ लागले. याच भांडवलावर मुलायमसिंह यांनी तब्बल दोन तपे आपले राजकारण केले. पण राजकारण खेळत असताना त्यांनी भाजपला उघडपणे विरोध करीत छुपेपणाने सदैव पाठिंबा दिला, हे गुपित राहिलेले नाही. म्हणूनच बुधवारी त्यांनी भाजपच्या पंतप्रधानांना आगामी निवडणुकीसाठी दिलेले शुभाशिर्वाद हे आश्चर्य वाटण्याजोगे नाहीत. खरे म्हणजे, मुलायमसिंह यादव यांच्या आशीर्वादांना आता किंमत उरलेली नाही. कारण त्यांच्या पक्षातच त्यांची किंमत शून्य झालेली आहे. त्यांचे बंधू शिवपालसिंह यादव आणि चिरंजीव अखिलेशसिंह यांच्यात विस्तव जात नाही. दि. 30 डिसेंबर, 2016 रोजी अखिलेशने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली. त्यावेळी मुलायमसिंह यांनी चिरंजीवांची पक्षातून हकालपट्टी केली. पण 24 तासांत त्यांना पुन्हा पक्षात घेतले. त्याच्या पुढच्याच दिवशी लखनऊ येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात मुलायमसिंह यांच्या जागी अखिलेशसिंह यादव यांची समाजवादी पार्टीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आज मुलायम काहीही म्हणत असले तरी त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा हे त्यांचे चिरंजीव अखिलेशसिंह आहेत. ते म्हणतील तीच समाजवादी पार्टीत पूर्व दिशा ठरत आहे. उत्तर प्रदेशात मायावती यांच्याशी हातमिळवणी करून अखिलेश भाजपला विरोध करण्यास सिद्ध झाले आहेत. या दोघांनी लवकरच काँग्रेसशी हातमिळवणी केल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तेव्हा `मुलायम’ नावाच्या ढोंगांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाभलेले आशीर्वाद हे निरुपयोगी आहेत.”

