Details
गडकरींचा मराठी बाणा
25-Dec-2018
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
भाजपचे भूतपूर्व अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी हे परखडपणाच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. ते मंत्री असले तरी गोलमाल विधाने करीत नाहीत. आत एक आणि बाहेर एक असे ते वागत नाहीत. अलिकडेच पुन्हा एकदा त्यांनी एक परखड विधान केले आहे. किंबहुना, ते विधान करुन त्यांनी आपला मराठी बाणा दाखविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीमुळे त्यांच्या मंत्रीमंडळातील जे मंत्री खासगीत बोलतात ते गडकरी जाहिरपणे बोलले आहेत. तीन हिंदी भाषिक राज्यांत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर गडकरी म्हणाले की, ‘राजकीय नेतृत्वाने यशाप्रमाणे अपयशाची देखील जबाबदारी स्विकारावी अशी अपेक्षा आहे.’ ज्या निवडणुकांकडे 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते त्याच निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यानंतर गडकरींनी केलेले हे विधान महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून उभे राहण्यात ते समर्थ आहेत. याचा दुसरा अर्थ असाही आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 च्या निवडणुकीनंतर ‘प्लान बी’ तयार ठेवला आहे. नितीन गडकरी हे उत्तम प्रशासक आणि संघटक आहेत. 1995 साली महाराष्ट्रात युती सरकार सत्तेवर येताच गडकरी यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक बांधकाम खात्याने मुंबई-पुणे दु्रतगती महामार्ग द्रुतगतीने पूर्ण केला.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेवून त्यांनी तब्बल 36 उड्डाण पूल बांधले. पुन्हा हे सारे करीत असताना त्यांनी पैसा कमी पडू दिला नाही. आता केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी देशभर पक्क्या आणि रुंद महामार्गांचे जाळे विणण्याचा सपाटा लावला आहे. अब्जावधी रुपयांची कामे देशात सुरु आहेत. गडकरींचे वैशिष्ट्य म्हणजे ते उड्डाण पूल बांधण्यात जसे वाकबगार आहेत तसेच विविध पक्षांतील नेत्यांशी जोडणारे मैत्रीचे पूल बांधण्यात देखील ते निपूण आहेत. महाराष्ट्रातील शक्तीमान नेते खा. शरद पवार यांचे नितिन गडकरी हे इर्श्रीश शूशव लेू (लाडका मुलगा) आहेत असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये.
पुण्यात यशस्वी अशा छोट्या बँकर्सच्या मेळाव्यात बोलताना गडकरी यांनी बँँकींग संदर्भात वरील विधान केले होते. ते राजकारणात देखील लागू पडते असे म्हटले होते. तथापि, दुसर्या दिवशी मात्र आपली विधाने काही प्रसार माध्यमे ट्ववीस्ट करुन छापतात असे देखील म्हटले होते. ते काही असो. धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा मागे घेता येत नाहीत. गडकरींना देखील हे चांगले ठाऊक आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यास भाजपमधील मोदी विरोधक उसळून उठतील. मित्र पक्षातील मंडळी देखील त्यांना पाठींबा देण्यास मग नकार देतील. अशा परिस्थितीत सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांचे नाव पुढे आल्यास नवल नाही. नितीन गडकरी आपल्या स्वभावानुसार कोणाचाही मुलाहिजा न राखता बोलले हेच खूप झाले. महाराष्ट्राच्या या मराठमोळ्या नेतृत्वास आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा!”

