Details
hegdekiran17@gmail.com
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेज व सुधारणा जाहीर करताना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या पात्रता निकषाच्या मर्यादा वाढवून उद्योग क्षेत्राची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. या घोषणेतही सुधारणा करून मध्यम उद्योगासाठी ५ कोटी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून २० कोटी करण्यात आली. ती पुन्हा वाढवून ५० कोटी गुंतवणूक अथवा २०० कोटींपर्यंतची उलाढाल अशी करत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.”
“महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष मार्गदर्शन सत्राप्रसंगी ते बोलत होते. वेसमॅकचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागतपर भाषणात लघुद्योग क्षेत्राच्या विविध अडचणी व अपेक्षा मांडल्या. विशेषतः 3 लाख कोटींच्या पॅकेजची तत्काळ व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अडचणी निवारण्यासाठी समन्वय समिती असावी, मुद्रा कर्जाची मर्यादा २५ लाख करावी, विजेचे दर कमी व्हावेत व संपूर्ण देशात एकच दर असावा, छोट्या व मोठ्या सर्वच उद्योगांसाठी, ज्यांचे कर्ज पुनर्बांधणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते प्राधान्याने मार्गी लावावेत. कौशल्य विकास संस्थांचा एमएसएमईच्या व्याख्येत समावेश करावा या विषयांचा विशेष उल्लेख केला.”
“महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी पॅकेज अंमलबजावणीची प्रक्रिया सुटसुटीत असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सरकारी विभागाकडून दिलेल्या माल पुरवठ्याच्या मागण्या रद्द केल्या जात आहेत, याविषयी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार धैर्यशील माने यांनी बेंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरीडोरचे काम सुरू करावे, ग्रामीण भागात कृषिपूरक व कृषिप्रक्रिया या उद्योगांचे क्लस्टर उभारावे, रत्नागिरी-नागपूर हायवे चे काम लवकर मार्गी लावावे या अपेक्षा मांडल्या.”
सेलो गृपचे चेअरमन व जीतोचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी ग्रामीण भागात उद्योग स्थापण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू करावी असे सांगितले. भारतीय लघुद्योग विकास बँक (सिडबी)चे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर मनोज मित्तल यांनी सरकारच्या नवीन पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी सिडबी पुढाकार घेऊन कार्यरत राहील असे सांगितले.

