मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याला भविष्यातदेखील भक्कम पाठिंबा देऊ असे आश्वासन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
आखाड्याच्या नवीन मॅटच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दोन हजार साली नाईक यांच्या हस्ते या आखाड्याचेदेखील उद्घाटन करण्यात आले होते. सध्याचे आखाड्याचे विस्तृत स्वरुप बघून नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच २४ वर्षांत आखाड्याने या खेळात केलेल्या प्रगतीचेदेखील त्यांनी कौतुक केले. यावेळी मीरा भाईंदर

कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मिलिंद लिमये यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व बजरंगबलीची मूर्ती प्रदान करून गणेश नाईक यांचा खास सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. आखाड्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कुस्ती मैदान भरवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी ओमप्रकाश गरोडिया, नारायण पोद्दार, अजित पाटील, प्रकाश दुबोले, विद्या रेवणकर आदि प्रमुख मंडळीदेखील उपस्थित होती. वस्ताद वसंतराव पाटील यांना प्रतिष्ठा फाउंडेशन सांगलीच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय प्रतिष्ठा क्रीडारत्न पुरस्कार २०२५” मिळाल्याबद्दल गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विशाल माटेकर, विशाल जाधव, सूरज माने, मनीषा शेलार, सुदीक्षा जैस्वर, डॉली गुप्ता, मनस्वी राऊत, ओम जाधव या कुस्तीपटूंचा सत्कारदेखील नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला. पैलवानांना भेटवस्तू श्री साई ज्वेलर्सचे मालक सुधाकर गायकवाड यांनी दिल्या. सदर कार्यक्रमाचे समालोचन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.