Homeटॉप स्टोरी.. जेव्हा मुख्यमंत्री...

.. जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला सुरेश भटांच्या ओळींचा आधार

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शाब्दिक चिमटे काढणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जोरदार टीका केली. ती करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे…, या कवितेचा आधार घेतला आणि विरोधकांसह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. जयंतराव, तुम्ही अजितदादांचे ऐकत नाही आणि माझेही ऐकत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, अशी टिप्पणी फडणवीस यांनी करताच सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

दावोस शिखर परिषदेतील गुंतवणुकीची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, जयंतराव तुमचा प्रॉब्लेमच हा आहे की, चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता, असे फडणवीस म्हणताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. योग्य गोष्टी, योग्य लोकांसोबत आणि योग्य वेळी सांगितल्या तर कार्यान्वित होतात, असे फडणवीस यांनी म्हणताच सदस्यांनी त्यांना दाद दिली.

गुंतवणुकीच्या करारांबद्दल किमान जयंतरावांनी तरी शंका व्यक्त करायला नको, अशी अपेक्षा करून फडणवीस म्हणाले की, रोहित पवारांनी शंका घेतली तर मी समजू शकतो. कारण ते तुलनेने तरुण आहेत. ते अनभिज्ञ आहेत म्हणत नाही मी.. पण ते तरुण आहेत. त्यांनी किंवा वरुणने (सरदेसाई) शंका घेतली तर मी समजू शकतो, असेही फडणवीस म्हणाले. जयंत पाटलांना उद्देशून फडणवीस म्हणाले की, आपले गझलकार कविवर्य सुरेश भट काय म्हणतात बघा. साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, आताच शंकेखोर जे त्यांचे कधी होईल बरे? फडणवीस यांनी भट यांच्या या ओळी उद्धृत करताच सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

फडणवीस

ना माध्यमांकडे क्वालिटी बातम्या.. ना विरोधकांकडे टीकेचे मुद्दे!

मी, एकनाथ शिन्दे आणि अजित पवार यांच्यात उत्तम समन्वय असून राज्य सरकार सर्व निर्णय समन्वयातून घेत आहे, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले. तिघांपैकी कोणीही नाराज नाही आणि स्थगिती दिलेल्या प्रकल्पांपैकी बहुतांश निर्णयांमध्येही आमच्या तिघांचाही सहभाग होता, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

माध्यमांवर खापर फोडताना ते म्हणाले की, हल्ली शिन्देंनी केलेले प्रकल्प फडणविसांकडून रद्द, ही बातमी माध्यमांसाठी आवडती बातमी झाली आहे. पण, नोकरशाहीत खालच्या पातळीवर विभागीय आयुक्तांकडून एखादा प्रकल्प रद्द केला गेला तरी फडणविसांचा शिन्देंना दणका, अशी बातमी दिली जाते. त्याचे कारण माध्यमांकडे क्वालिटी बातम्या नाहीत आणि विरोधकांनाही सरकारवर टीका करता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अशा बातम्या दिल्या जातात, असा दावाही फडणवीस यांनी केला.

दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ, अशी म्हण मराठीत आहे. पण तिघांचे भांडण माध्यमांचा लाभ, अशी नवी म्हण गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात रूढ होऊ घातली होती. पण फडणवीस यांनी शिन्दे आणि आपल्यात कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचा दावा केला. कोणत्याही बैठकीला तिघांपैकी एखादा नसला की तो नाराज, अशा बातम्या दिल्या जातात, असे फडणवीस यांनी सांगताच कॉँग्रेसचे नाना पटोले बसल्या जागेवरूनच तुम्ही अजित पवारांचे नाव घेत नाही, असे म्हणाले. त्यावर फडणवीस उत्तरले, अजितदादा आक्रमक आहेत आणि ते थेट अंगावरच जातात, असे उत्तर दिले. त्यावर सभागृहात हंशा उसळला. आणि अजित पवार यांनीही नाना पटोले यांच्याकडे रोखून बघत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content