कोरोनाविरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ १३ लोकांना व राज्यभरात केवळ १८१ लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यात ९.८३ लाख लसी उपलब्ध असतानासुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची रड करत केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य व अजब-गजब कारभारामुळे महाराष्ट्र देशाचा कोरोना कॅपिटल बनला आहे. कोरोना संसर्ग व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत दुर्दैवाने आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असून, राज्याचा मृत्यूदर आजही २.५४% इतका आहे तसेच मागील महिन्याभरात देशातील कोरोना रुग्णांचा दर झपाट्याने कमी होत असला तरीही आजसुद्धा देशातील एकूण रुग्णांपैकी ४२% टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्र व केरळ या दोनच राज्यातील असून मृत्यूदराच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्र देशात क्रमांक एक असल्यामुळे राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता होती. परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

मुंबईतील जेजे या एकाच रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हीच अवस्था राज्यभर आहे. काल संपूर्ण महाराष्ट्रात केवळ १८१ लोकांनाच लस देण्यात आली आहे. तसेच राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ‘इतके कमी लसीकरण होणे यात काहीही विशेष बाब नाही’ असे बेशरम वक्तव्य केले. अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाविरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमातसुद्धा आपली अकार्यक्षमता कायम ठेवली आहे, असा आरोपसुद्धा आ. भातखळकर यांनी केला आहे.
राज्य सरकारकडून हीच ‘गती’ कायम ठेवण्यात आली तर महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला लस मिळण्यास किती कालावधी लागेल याचा विचार राज्य सरकारने केला आहे काय? असा प्रश्नसुद्धा त्यांनी सरकारला विचारला आहे.


गंमतच आहे.