थॅलेसेमिया आजाराचा सामना करण्यासाठी त्याचे वेळेवर निदान आणि प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. योग्य वेळी प्रतिबंध केला, तरच या आजाराची जोखीम कमी करता येईल. थॅलेसेमियाचा सामना करण्यासाठी वेळेवर निदान आणि प्रतिबंध ही सर्वात प्रभावी धोरणे आहेत. देशात सुमारे 1 लाख थॅलेसेमिया रुग्ण असून, दरवर्षी अंदाजे 10,000 नवीन रुग्णांची यात भर पडत आहे, असे ते म्हणाले. स्क्रिनिंगद्वारे वेळेवर तपासणी करून सक्रियपणे हस्तक्षेप करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
या विषयावर व्यापक जनजागृतीची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, आजही अनेक जणांना या आजाराबद्दल आणि तो कसा रोखता येईल, याबद्दल माहिती नाही. या क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांनी थॅलेसीमियाबद्दल जागरुकता वाढवण्याच्या देशव्यापी मोहिमेसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2024/05/2-2.jpg)
या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, त्यांनी थॅलेसेमिया आजाराला प्रतिबंध करणाऱ्या प्रभावी पद्धती आणि सर्वोत्तम उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स अँड थॅलेसेमिक्स इंडियाच्या सहकार्याने तयार केलेला व्हिडिओ प्रदर्शित केला. केंद्रीय आरोग्य सचिवांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सध्याच्या प्रजनन आणि बालआरोग्य कार्यक्रमांतर्गत थॅलेसेमिया चाचणी अनिवार्य करण्याची शिफारस केली.
काही राज्यांनी त्यांच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये याचा समावेश केला असून, इतर राज्यांना थॅलेसेमिया आजाराचे स्क्रीनिंग आणि चाचणीचा समावेश करून त्याचा विस्तार करण्याचा आग्रह केला जाईल. थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्त विकार असून त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीच्या खाली राहते. दरवर्षी साजरा केला जाणारा, आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन हा रोग प्रतिबंधाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी, जागरुकता वाढवण्यासाठी, भागधारकांमध्ये संवेदना निर्माण करण्यासाठी, लवकर निदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि थॅलेसेमियाने प्रभावित झालेल्यांसाठी दर्जेदार काळजी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो, असेही अपूर्व चंद्रा म्हणाले.