Friday, September 20, 2024
Homeडेली पल्सजगभर मराठी पोहोचविण्याची...

जगभर मराठी पोहोचविण्याची जबाबदारी आपलीच!

मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनादीकाळापासून या भाषेचे महत्त्व व अस्तित्त्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच अन्य एखाद्या भाषेत तयार झाले असणार. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक ह्या सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचे आमूलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे जो केवळ महाराष्ट्रपुरता सीमित नाही. भारत देशात भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आहे. याच विभागणीतून मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अनेक वर्षे उलटून गेली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा देण्यासाठीच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांतरचनेची उद्दिष्टंच भाषांना समृद्ध करण्याची होती. परंतु मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा करण्यात आलेले प्रयत्न पुरेशा सामर्थ्याने झालेले नाहीत. म्हणूनच आज मराठी भाषेच्या अस्तित्त्वाबद्दल चर्चा करण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे.

आजचे युग विज्ञानाचे आहे, डिजिटल आहे. या युगात मराठीचे स्थान काय याचा विचार आज आपल्याला करावा लागत आहे. मराठी भाषेच्या अस्तित्त्वाबाबत किंवा स्थानाबाबतच नव्हे, तर मराठी भाषेच्या भवितव्यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची आणि त्या अनुषंगाने कृतिशील होण्याची आज गरज निर्माण झाली आहे. २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! पण हा दिन किती मराठी जनांना आवर्जून लक्षात आहे? ऐनवेळी मराठीचे वैचारिक गोडवे गाणारे आपल्या बोलण्याचालण्यातून मराठीला सोयीस्कर फाटा देण्याचे काम जागोजागी करताना दिसतात. मग मराठी भाषा वाढणार कशी? आजकालच्या इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. पण त्याला कारणीभूत मराठीचा पिंड जन्माला घेऊन आलेलेच आहेत. डिजिटल युगाने अनेकांना पुढारले, सावरले, गतिमान केले. मग मराठीसाठी डिजिटलतेचा वापर करायला काय हरकत आहे?

आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती अनाठायी आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग आज खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. मराठीचा वापर व वावर आज शैक्षणिक क्षेत्रापासून ते सरकारी कार्यालयापर्यंत मजबुतीने उभा आहे. वेळ आहे ती आपल्या आग्रहाची, अट्टहासाची व कृतीची, मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची! जमेल तिथे जास्तीतजास्त ठिकाणी ती भाषा बोलणे हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. महाराष्ट्राशेजारील राज्ये आपापल्या भाषेचा कडवा पुरस्कार करत असताना आपण म्हणावा तितका न्याय आपल्या मातृभाषेला देत नाही ही शोकांतिका अगोदर पुसून काढावी लागेल.

आजच्या घडीला मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या सुमारे दहा कोटींच्या घरात आहे. पुढच्या ५० वर्षांतसुद्धा ही संख्या भक्कमच राहणार आहे. यामुळे आपण दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर सदासर्वदा, हिरीरीने केला पाहिजे. आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यात यायला हवा. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी याबरोबरच वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी, आगरी, खानदेशी असे अनेक भेद मराठीत आहेत, ज्यांची प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समुहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केलाच पाहिजे. भाषेच्या विकासासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. मात्र राज्यात शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप मोठा वर्ग अद्यापि दूरच आहे. त्यात पुन्हा मुलांपेक्षा मुलींचे शाळागळतीचे प्रमाण अधिक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाची चर्चा करायची तर पहिल्यांदा ही गळती थांबवली पाहिजे. त्यातही मराठी शाळा व मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उंचावली पाहिजे. याकरता सर्व मुले-मुली निदान दहावीपर्यंत शिकतील आणि मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळेल असे सरकारी नियोजन असायला हवे.

शासकीय कामकाजात मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य बजावताना मराठीत लिहिता, वाचता, बोलता येणे अनिवार्यच झाले आहे. सरकारी नावे मराठीत असावीत, अभ्यास गट, समित्यांनी त्यांचे अहवाल मराठीतूनच द्यावेत, सर्व सरकारी योजनांची नावं मराठीत द्यावीत, ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकांमध्ये, सभांमध्ये मराठीतून भाषणे करावी, मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय मराठीतून द्यावेत, सरकारी जाहिराती, निविदा किमान दोन मराठी वर्तमानपत्रात द्याव्या, नाव लिहिताना इंग्रजी अद्याक्षरांऐवजी मराठी अद्याक्षरांचा वापर करावा, माहिती तंत्रज्ञान विभागाने माहिती अधिकार, आपले सरकार, ई निविदा इत्यादी ऑनलाईन सेवा/पोर्टल मराठी भाषेतच उपलब्ध करुन द्यावे अशा प्रकारच्या मराठमोळ्या सूचना देणारा अध्यादेश शासनाने काढला आहे. खरेतर महाराष्ट्रासारख्या राज्यात मायमराठीचा सन्मान व्हावा असाच हा निर्णय आहे. देशातील अनेक राज्ये आपापल्या राज्यांच्या अस्मिता व भाषेचा प्रखर पुरस्कार करत असताना मराठी भाषा नामशेष होऊ नये म्हणून हा सरकारी प्रयत्न वाखाणण्याजोगाच आहे. मात्र विविध सरकारी रिक्त जागांसाठी काढण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियांमध्ये मराठीचा उल्लेख केवळ ‘मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक’ इथपर्यंतच केला जातो. त्यामुळे तोडके मोडके का होईना मराठी भाषा अवगत असणारे परराज्यातील उमेदवारदेखील या परीक्षांसाठी पात्र ठरतात व नोकऱ्या मिळवतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठी भाषा ही सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ माहीत असणे आवश्यक नसून उमेदवाराचे शिक्षणदेखील मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले पाहिजे अशी अट स्पर्धा परीक्षांमध्ये घातल्यास खऱ्या अर्थाने मराठी मुलांना त्यामध्ये स्थान मिळेल असे वाटते.

सीबीएसई, आयसीएसई यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमांमुळे राज्यातील मराठी शाळांना लागलेली घरघर पाहता मराठी पाऊल पुढे न पडता मागे पडत चालल्याचे चित्र आहे. आज शहरी भागांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा फार अपवादानेच आढळतात. जी मिळेल तिथलीही उपस्थिती अगदी नगण्यच किंवा दखलपात्र नसते. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच उरल्या असल्याचे चित्र आहे. त्यातही मराठीची सक्ती ही संकल्पना नोकरी, व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रांत कुठेही अद्याप दृढ झाली नसल्याने बऱ्याच क्षेत्रांतून मराठी हद्दपार होत चालल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील स्थानिकांची बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत असताना शासकीय नोकरभरतीमध्येदेखील परप्रांतीय उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज करून नोकऱ्या मिळवू लागले आहेत. त्यामुळे मराठी भाषेला व मराठी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील शासकीय नोकरभरतीत मराठी माध्यमांमध्ये शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची गरज आहे. तशीही मराठी भाषा सध्या ग्रामीण महाराष्ट्रापुरती उरली असून तिचे संवर्धन व जतन करण्यासाठी मराठी शाळा जगवल्या पाहिजेत.

आज धावत्या युगात इतरांशी स्पर्धा करण्यासाठी पालकांचा कलदेखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक वळत असल्याने घराघरात मुले खूप शिकली, परंतु मराठीपासून दुरावली अशी परिस्थिती आहे. खरेतर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या अनेक मुलांनी निरनिराळया क्षेत्रांत असामान्य प्राविण्य मिळवल्याची अनेक उदाहरणे देता येतील. मात्र राज्यातील सद्याची परिस्थिती याच्या बिलकुल विपरीत आहे. तंत्रज्ञान, जागतिकिकरण व स्पर्धेच्या या घातक युगात मराठीला मात्र दुय्यम स्थान मिळत चालल्याचे दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या आ वासून उभी आहे. यामुळे सैरभैर होत चाललेला मराठी तरुण वाममार्गाला लागण्याची भीतीदेखील आहेच. म्हणूनच मराठी माध्यमातील शिक्षणानंतर मुलांना राज्यातच नोकऱ्या मिळवून देण्यासाठी संधी निर्माण करायच्या असतील तर राज्याच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्याने सामावून घेण्याची आवश्‍यकता आहे.

आज संगणक- इंटरनेट युगात मराठीला जागतिक स्तरावर विस्तार पावण्यासाठी चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. आज  संगणकावरील युनिकोड भाषेमुळे मराठी लिहीणे, वाचणे आणखीनच सोपे झाले आहे. मायक्रोसॉफ्टने संगणकावर मराठीतून सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, माहितीची साठवणूक, हिशेब ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मराठी-इंग्रजी शब्दकोश, शुद्धलेखनाची आज्ञावली आता संगणकाच्या पडद्यावर, इंटरनेटच्या महाजालावर उपलब्ध आहे. मराठी वर्तमानपत्रे इंटरनेटच्या माध्यमातून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आता वाचता येतात. विशेष म्हणजे गुगलवर आपल्याला हवं ते सर्च केलं तर लगेच ते मिळतं. मराठी साहित्‍याच्‍या अनेक वेबसाइट्स आज इंटरनेटवर उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे घरबसल्या जुनं-नवं साहित्य वाचायला मिळतंय. आता तर मराठी विश्वकोशाचे सगळे खंड विश्वकोशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वेब, ब्लॉग, रेडिओ यामुळे प्रकाशकाच्या मध्यस्थीशिवाय कुणालाही आपले लेखन, मनोगत आपल्या भाषेत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. या बाबींचा लाभ घेत मराठी तरुणांनी संगणक – इंटरनेटचा वापर करताना शक्य असेल त्या ठिकाणी मराठीचाच वापर आवर्जून केला पाहिजे. डिजीटल संस्‍कृती मराठी भाषेसाठी पोषक असून मोठया प्रमाणावर इंटरनेटचा वापर करणाऱ्या समस्‍त मराठीजनांनी हया डिजीटल दुनियेचा वापर मराठीच्‍या विकासासाठी करायला हवा. इंटरनेटने जग जवळ आले आहे असे आपण म्‍हणतो. पण त्‍याच जगाजवळ आपली मराठी पोहोचवण्‍याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.

Continue reading

आनंदात वचन तर रागात निर्णय नेहमीच घातक!

आनंदात वचन तर रागात निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. ते नेहमी घातक ठरते. यासाठीच लागते मनावर नियंत्रण. १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशील विषय...

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झाले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असून त्‍याचा...

करूया संकल्प लोकसंख्या नियंत्रणाचा!

आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटींच्या घरात होती. सन 1987 साली ही लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987पासून जागतिक लोकसंख्या दिन...
error: Content is protected !!
Skip to content