Homeटॉप स्टोरीजोडीदार निवडताना जास्तीतजास्त...

जोडीदार निवडताना जास्तीतजास्त पुरुषांना हवे प्रेम आणि रोमान्स!

विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना २९% महिला तसेच ४७% पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ३९% महिला आपला जोडीदार सुसंगत असावा, याला अग्रक्रम देत असल्याचेही दिसून आले आहे. केवळ ११% अविवाहित असे आहेत, जे जोडीदाराची निवड करताना आर्थिक स्थैर्य हा सर्वात महत्त्वाचा घटक मानतात. जोडीदार निवडताना प्रादेशिक भेददेखील दिसून आला आहे. दिल्ली आणि मुंबईतील अविवाहितांच्या लेखी रोमान्सला महत्त्व आहे, तर बेंगळुरूमधील अविवाहित सुसंगततेवर भर देत असल्याचे दिसले.

जीवनसाथी, या मॅचमेकिंग प्लॅटफॉर्मने २१ हजारपेक्षा जास्त प्रतिसादकांच्या विचारांवर आधारित ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ नुकताच जारी केला. हा अहवाल भारतीय अविवाहितांमधील नात्यांसंबंधी बदलत्या प्राथमिकतांवर प्रकाश टाकतो. या निरीक्षणांमधून सूचित होते की, पुरुष जास्तकरून प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देतात, तर महिला जास्तकरून सुसंगततेला (कम्पॅटिबिलिटी) महत्त्व देतात. विवाह, आर्थिक स्थैर्य आणि जोडीदाराची निवड करण्यात माता-पित्याचा प्रभाव याबाबतीत बदलत चाललेल्या वृत्तीवरदेखील हा अहवाल प्रकाश टाकतो.

या अहवालात असेही आढळून आले की, ४०% अविवाहित योग्य जोडीदार मिळाल्यास परदेशी जायला तयार आहेत. हा पारंपरिक अपेक्षांमधील मोठा बदल आहे. परंतु, ७०% पालक मात्र अशी अपेक्षा करत आहेत की, आपल्या मुलांनी लग्न करून भारतातच राहवे किंवा भारतात परतावे. शहरानुसार या विचारसरणीत बदल होत असल्याचे दिसते. मुंबई, पुणे आणि बेंगळुरूमधील प्रतिसादकांनी एनआरआय जोडीदाराशी विवाहबद्ध होण्याची तयारी अधिक दर्शविली आहे. तर, दिल्लीतील अविवाहित मात्र भारतातच स्थायिक होण्याबाबत आग्रही दिसतात.

जीवनसाथीचे चीफ बिझनेस ऑफिसर रोहन माथुर म्हणाले की, भारतीय अविवाहित नातेसंबंधाच्या नियमांना नव्याने आकार देत आहेत. सुसंगततेला आणि व्यक्तिगत आवडी-निवडीला पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत. जीवनसाथीच्या ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’मध्ये ही बदलती विचारसरणी स्पष्ट दिसून येते. यामध्ये प्रेमाचे वाढते प्राधान्य दिसते. म्हणजेच सामाजिक दबावापेक्षा व्यक्तिगत मूल्यांशी निगडित प्रेमाला वाढती प्राथमिकता देण्यावर भर दिसून येतो. एक विश्वसनीय मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून अर्थपूर्ण नाती जोडण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी अविवाहितांना सक्षम करण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत.

वय वर्ष २७च्या खालील अविवाहितांच्या मते, २७-३० हे विवाहबद्ध होण्यासाठीचे आदर्श वय आहे. परंतु वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावर विवाह केला पाहिजे. हा विवाहयोग्य वयाच्या बाबतीतील एक अधिक लवचिक दृष्टिकोन आहे. लग्नावर होणाऱ्या खर्चात समान आर्थिक विभागणीची अपेक्षा या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे. सुमारे ७२% अविवाहित मानतात की, खर्च दोन्ही जोडीदारांमध्ये वाटला गेला पाहिजे. फक्त १७% अविवाहितांना असे वाटते की, ज्यांना थाटामाटात लग्न करायची इच्छा असेल, त्यांनी स्वतःच हा खर्च केला पाहिजे. विचारातील हा बदल पालकांनादेखील मान्य आहे. एका बाजूच्याच पक्षावर आर्थिक बोजा येण्याच्या पारंपरिक पद्धतीपासून दूर जाण्याचा संकेत यातून मिळतो.

माता-पिता आता मुख्यतः विश्वसनीय सल्लागार बनले आहेत आणि निर्णय घेण्याचा अधिकार मोठ्या प्रमाणात स्वतः उपवर मुला-मुलीकडे आहे. फक्त ४% प्रतिसादकांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील त्यांच्या पसंतीचा जीवनसाथी निवडतील. यावरून विवाहविषयक निर्णय घेण्यातील स्वायत्ततेचे वाढते प्रमाण दिसून येते. जोडी जुळवताना ज्योतिषशास्त्रासंबंधी दृष्टिकोन सतत बदलत आहे. दिल्लीतील प्रत्येक तीनपैकी एक प्रतिसादक असे मानतो की कुंडली जुळवणे महत्त्वाचे आहे. मात्र मुंबईतील अविवाहित कुंडली जुळवण्यापेक्षा व्यक्तिगत सुसंगततेला प्राधान्य देताना दिसतात. आधुनिक नात्यांत संतुलन आणि व्यक्तिगत ध्येये आणि मूल्ये यांची कास न सोडता प्रेम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या प्राथमिकता बदलत आहेत.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content