तुम्ही आनंद वाटता की दुःख
हे तुम्हीच ठरवायचे असते,
लक्षात ठेवा जीवनविद्या
ही जगायची असते…
यूट्यूबवर प्रसिद्ध असलेले हे गीत म्हणजे श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून स्फुरलेली गुरुकिल्ली आहे. किंबहुना ‘कृतज्ञता मनात भरभराट जीवनात’ हा जीवनमंत्र कसा जपायचा ते शिकवितात. केवळ त्यापुरतेच मर्यादित न राहता जीवन युक्तीने कसे जगायचे याचे उत्तम मार्गदर्शन प्रल्हाददादा गेली अनेक वर्षे करीत आहेत. मानवी जीवनात कृतज्ञतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु पावलोपावली कृतज्ञतेने स्मरण कसे करावे याचे संशोधनात्मक तात्विक विश्लेषण प्रल्हाददादा करतात. यामुळेच ते ‘कृतज्ञतेचा महामेरू’ आहेत. आपले जीवन उत्तम रीतीने जगण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अनेक महान विचारवंतांचे सखोल मार्गदर्शन आपण घेत असतो. बऱ्याचदा असे आढळते की, हे मार्गदर्शन ऐकायला बरे वाटते. परंतु प्रत्यक्षात अवलंब करताना मात्र ते थोडेसे अवघड होते. याचे कारण असे की, त्यातील युक्तीयोग सर्वांना समजतोच असे नाही. आता हा युक्तीयोग म्हणजे नेमके काय हे समजण्यासाठी अर्थातच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्त्वज्ञान अभ्यासणे जरुरी आहे. सत्तर वर्षांहून अधिक कालावधी जीवनविद्या तत्त्वज्ञान केवळ भारतातच नव्हे तर जगभरात स्वीकारले जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जीवनविद्या हे केवळ अध्यात्मशास्त्र नसून ती जीवन जगण्याची कला आहे. जगाच्या पाठीवर हे एकमेव शास्त्र असे आहे की ज्यामध्ये यशस्वी जीवन, सुखी जीवन जगताना परमार्थसुद्धा साधणे शक्य आहे.
सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सखोल चिंतन, अभ्यास करून दिव्य साधनेतून जीवनविद्या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली.
बुडती हे जन न देखवे डोळाll
हिताचा कळवळा येतो त्यांच्याll
संतांच्या वरील उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव सद्गुरु श्री वामनराव पै यांनी घेतला आणि सर्वसामान्य माणसाला मनःस्थिती बदलून परिस्थिती बदलण्याचा, सुखी जीवन जगण्याचा राजमार्ग दाखविला. भारताचे हे अहोभाग्य आहे की असे अनमोल तत्त्वज्ञान निर्माण करणारे थोर विचारवंत आपल्या देशात आहेत. किंबहुना प्रत्येक मराठी माणसाचा सद्गुरु श्री वामनराव पै हे अभिमान आहेत. आजवर लाखो लोकांनी या तत्त्वज्ञानाचा लाभ घेतला. त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली. सद्गुरूंनी वयाच्या 89 वर्षांपर्यंत प्रवचनांच्या माध्यमातून सातत्याने जीवनविद्या तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 1952 साली लावलेले इवलेसे रोप, आता त्याचा वेलू गगनावरी गेला आहे. 2012 साली सद्गुरुंचे महानिर्वाण झाले. परंतु त्यानंतर प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनविद्येची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आजमितीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी अशा विविध देशांमध्ये प्रल्हाददादा अनमोल मार्गदर्शन करीत आहेत.
श्री. प्रल्हाद वामनराव पै यांची ओळख सांगायची झाली तर ते उच्च विद्याविभूषित आहेत. मुंबई आयआयटी पवई येथून त्यांनी बी टेकचे शिक्षण पूर्ण केले. जमनालाल बजाज, या प्रतिष्ठित संस्थेमधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर जपान येथून टोटल क्वॉलिटी मॅनेज मॅनेजमेंटदेखील पूर्ण केले आहे. गेली अनेक वर्ष ते कॉर्पोरेट सेक्टरमधून उच्च पदांवर कार्यरत राहून निवृत्त झाले आहेत. परंतु हे करीत असताना त्यांनी जीवनविद्येचे तत्त्वज्ञान सद्गुरुंकडून आत्मसात केले. अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे तसेच त्यांना त्यांच्याप्रमाणेच हुशार असलेल्या सुविद्य, प्रेमळ पत्नी मीलनताई यांची समर्थ साथ लाभल्याने गेल्या काही वर्षांत जीवनविद्येचे तत्त्वज्ञान अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्यात अपार कष्ट घेतले आहेत.

सद्गुरुंकडून जीवनविद्या तत्त्वज्ञान आत्मसात करीत असताना प्रल्हाददादा यांनी हे तत्त्वज्ञान रोजच्या जीवनामध्ये युक्तीने कसे वापरता येईल याचे सखोल चिंतन केले. त्याचा फायदा विविध लोकांना ते त्यांच्या जीवनात, प्रपंचामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये, परमार्थामध्ये कसे वापरायचे हे कळले. अर्थातच त्यांचे जीवन यशस्वी झाले. एक अनुभव सांगावासा वाटतो. कॅनडामध्ये वास्तव्यास असताना एक भारतीय डॉक्टर शिल्पा लाड यांच्या कामाने प्रभावित झालेल्या एक कॅनेडियन डॉक्टर जीन सिलि तेथील युनिव्हर्सिटीच्या डीन चक्क जीवनविद्या तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात आल्या. त्यांनी जीवनविद्या मिशनच्या कर्जत येथील ज्ञानपीठाला भेट देऊन तत्त्वज्ञान शिकून घेतले. इतकेच नव्हे तर सद्गुरुंचा अनुग्रहदेखील स्वीकारला. डॉक्टर जीन सिली यांनी कॅनडामध्ये प्रल्हाददादा यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. तेथील स्टाफसाठी त्यांचे मार्गदर्शन आयोजित केले. असे कितीतरी मान्यवर, उच्चविद्याविभूषित लोक प्रल्हाददादांच्या मार्गदर्शनाने प्रभावित होत आहेत. याचे कारण ते अत्यंत सुलभ रीतीने, सोप्या भाषेत समृद्ध जीवन जगण्याचे ज्ञान देतात.
श्री. प्रल्हाद वामनराव पै यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कार्यदेखील सर्वसमावेशक आहे. परमार्थातील ‘सच्चिदानंद स्वरूप’ हा कठीण विषय सर्वात सोपा करून श्रोत्यांना उपयुक्त ठरेल अशाप्रकारे ते सांगतात. गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात विविध कोर्स फॅकल्टीज तयार करून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोर्स हा उपक्रम यशस्वी रीतीने राबविला आहे. आजवर अनेक विद्यार्थ्यांनी या कोर्समुळे सुंदर रीतीने आपले जीवन घडविले आहे. प्रल्हाददादांनी प्रत्येक जीवाला आईच्या गर्भात असल्यापासूनच जीवनविद्येचे तत्त्वज्ञान मिळावे याकरिता गर्भसंस्कार कोर्सेसचे डिझाईन केले. त्याचे अनुभव नवजात बालकांचे पालक वेळोवेळी कथन करतात. अनेक लोक आज याचा लाभ घेत आहेत. वृद्धापकाळात परमार्थाकडे माणसे अधिक वळलेली आपण नेहमीच पाहतो. परंतु प्रल्हाददादा यांच्या आजूबाजूला पाहिल्यास असे लक्षात येते की, जास्तीतजास्त तरुण मुले प्रभावित झालेली आहेत. याचे कारण म्हणजे ते युवकांच्या बुद्धीला पटणारे, रुचणारे विचार देतात. त्यांना कोणत्याही कर्मकांडात अडकवून ठेवत नाहीत. याउलट विवेक आणि विज्ञान यांची जोड करून विकास कसा साधता येईल यासाठी युट्युबवरून ‘प्रल्हाद पै स्पीक्स’ नावाचे वेबिनार, पॉड कास्ट त्यांनी सुरू केले आहे.

प्रल्हाद पै एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापकपदावर कार्यरत असताना ते तेथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये नव्हे तर त्या कंपनीमधील सर्व कामगारवर्गांमध्येदेखिल तितकेच लोकप्रिय होते. याचे कारण म्हणजे त्यांना बालपणापासून मिळालेले जीवनविद्येचे बाळकडू होय. एकदा एका मोठ्या हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय नामांकन मिळविण्याच्या प्रक्रियेत त्यांनी सौहार्दपूर्ण मार्गदर्शन केले आणि कायदेशीर रीतीने ते नामांकन त्यांना मिळवून दिले. त्यांच्या याच व्यावसायिक अनुभवाच्या शिदोरीतून तसेच जीवनविद्येचे शहाणपण जोडून विविध अंगी मार्गदर्शन सातत्याने करीत आहेत. हे मार्गदर्शन इतके उपयुक्त ठरत आहे की, अनेक मुले त्यांच्या त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी होत आहेत. आपल्या देशात उच्चशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु ते ज्ञान योग्य रीतीने वापरून यशस्वी होण्याची युक्ती केवळ प्रल्हाद पै देऊ शकतात. त्यामुळे ‘युथ मेन्टॉर’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. असे मार्गदर्शन जर प्रत्येकाने घेतले तर आपला देश नक्कीच महाशक्तिशाली होईल यात शंका नाही.
आजच्या घडीला खऱ्या सद्गुरूंची वानवा असलेली आढळते. खरे सद्गुरु हे निरपेक्ष असतात, आत्मज्ञानी असतात, साधकांच्या हिताचा त्यांना कळवळा असतो आणि त्यासाठी ते स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवितात. हे सर्व गुण असूनदेखील प्रल्हाददादा स्वतःला सद्गुरु म्हणवून घेत नाहीत. किंबहुना साधकांनी हे करू नये असे नम्रपणे सांगतात. उच्च शिक्षण, अत्यंत विद्वान, एक यशस्वी पुत्र, प्रेमळ पती, कुटुंबवत्सल पिता, लाडके आजोबा आणि सर्व नामधारकांचे आनंदनिदान श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी 8 जुलैलाच वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जाण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग व्हावा. तसेच हे जग सुखी व्हावे हा सद्गुरु श्री वामनराव पै यांचा संकल्प सिद्ध व्हावा हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रल्हाददादांच्याच शब्दात सांगायचे झाले तर… आनंद वाटण्यासाठी फार काही करायचे नसते, एक सुंदर हास्यपण पुरुन उरते…
संपर्कः 9820451579