Homeपब्लिक फिगर..पहिल्या सत्काराने धनंजय...

..पहिल्या सत्काराने धनंजय मुंडे गहिवरले!

लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांनी नाथ्र्याचे नाव राज्यात आणि देशात केले. हे नाव पुढील ५० वर्षं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात टिकवून अग्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी आता आमची आहे, असे उद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथ्रा येथे बोलताना काढले.

आपल्या जन्मगाव नाथ्रा येथे पूर्ण करण्यात आलेल्या २.३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व नव्याने सुरू करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुंडे नाथ्रा येथे आले असता, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत केले. या सत्काराला उत्तर देताना धनंजय मुंडे बोलत होते.

जवळपास २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांचा नाथ्रा येथे हा पहिलाच नागरी सत्कार होता. संपूर्ण गाव अगदी दिवाळीप्रमाणे सजलेले, रोषणाई व फटाक्यांच्या अतिषबाजीने नटलेले दिसत होते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढत महिलांनी घरोघरी मुंडेंचे औक्षण करत ओवाळणी केली. त्यानंतर तब्बल एक टन वजनाचा हार घालून नाथ्रेकरांनी आपल्या भूमीपुत्राचे अविस्मरणीय असे स्वागत केले.

नाथ्रा येथे पांढरी १.२५ कोटी रुपये खर्चून उभारलेला उच्चालक बंधारा, वार्ड क्र. एकमधील ३० लाखांचे रस्ते व नाले, २० लाखांचे स्मशानभूमी कंपाउंड, १० लक्ष रुपये खर्चून उभारलेला पंडितअण्णा मुंडे प्रवासी निवारा, १० लाखांचे वाचनालय, २० लाखांचे जि. प. शाळेतील कंपाउंड व पेव्हर ब्लॉक, दोन्ही अंगणवाड्यांमधील मिळून १० लाखांचे पेव्हर ब्लॉक तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यातील ५ लाखांचे पेव्हर ब्लॉक आदी कामांचे मुंडेंच्या हस्ते लोकार्पण झाले.

अन् धनंजय मुंडे आठवणीत रमले..

गावकऱ्यांशी संवाद साधताना लहानपणापासून कधीही वाटलं नव्हतं की मी मंत्रीपदापर्यंत पोहोचेन. खरंतर आमच्या कुटुंबाचे स्वप्न गोपीनाथ मुंडेंना राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहण्याचे होते. लहानपणी विहिरींमध्ये, नदीमध्ये पोहायला जाणे, हाती बत्ती घेऊन मासे पकडण्यासाठी रात्रभर जागणे, याबाबरोबरच आपले दोन्ही चुलते माणिकराव मुंडे व व्यंकटराव मुंडे यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना धनंजय मुंडे यांना गहिवरून आले.

आमदार झालो तेव्हा आईइतकाच आनंद गावाला

माझ्या आयुष्यात अविरत संघर्ष वाट्याला आला. २००२च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत कोणतेही पद सहज मिळाले नाही. आमदारकीसाठी २००९ ते २०१९ असे तब्बल दहा वर्षे वाट पाहावी लागली. लोकांची कामे करण्यात वर्षे कशी निघून गेली कळले नाही. पण २०१९मध्ये जेव्हा मी विधानसभेला निवडून आलो तेव्हा माझ्या आईला जितका आनंद झाला, तितकाच आनंद माझ्या संपूर्ण गावाला झाला होता, हे सांगताना धनंजय मुंडे यांचे डोळे भरून आले.

..तर नाथ्र्याच्या मातीत जन्म घेईन!

मुंडे या नावाचा राज्यात आणि देशात दबदबा आहे. पण, या नावाला शोभेल असे काम गावासाठी आजवर करता आले नाही. गावाने नाव दिले, ओळख दिली, प्रेम दिले, विश्वास दिला. कोणतेही संकट आले तरीही लोकांच्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही काम मी कदापि करणार नाही, हा विश्वास देताना पुनर्जन्म जर खरंच होत असेल तर पुन्हा या नाथ्र्याच्या मातीतच जन्म घेईन असे म्हणतानादेखील धनंजय मुंडे यांचे डोळे पाणावले. 

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामेश्वरतात्या मुंडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट, आ. संजय दौंड, आश्रूबा कडपे, जि. प. गटनेते अजय मुंडे, डॉ. प्रा. मधुकर आघाव, डॉ. संतोष मुंडे, लक्ष्मणतात्या पौळ, गोविंदराव फड, राजाभाऊ पौळ, सूर्यभान नाना मुंडे, बालाजी (पिंटू) मुंडे, माऊली (तात्या) गडदे, प. स. सदस्य सुषमताई मुंडे, माणिकभाऊ फड, जानिमिया कुरेशी, वसंत तिडके, अय्युब शेख, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, दत्तात्रय गुट्टे, वसंत आघाव, प्रणव परळीकर, शंकर कापसे, संतोष शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यासह गावकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय दादांच्या धडाडीने प्रेरणा – अजय मुंडे

जि. प. गटनेते अजय मुंडे यांनी बंधू धनंजय मुंडे यांनी व सर्वच भावंडांनी गेल्या काही वर्षांत सहन केलेल्या राजकीय त्रासावर प्रकाश टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर खलनायक ते नायक हा प्रवास करताना धनुदादांनी कामांची धडाडी, लोकांना आपलेसे करणे त्याचबरोबर विरोधक जरी दारावर आला तर त्याचेही काम दुजाभाव न ठेवता करून देणे, ही वृत्ती जोपासली. आज त्यांची हीच वृत्ती आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देते असे सांगत कर्तबगार भावाच्या बाबतीतील आपल्या भावनांना अजय मुंडेंनी वाट मोकळी करून दिली.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content