Homeटॉप स्टोरीप्रवाशाला अवैधरित्या सूट...

प्रवाशाला अवैधरित्या सूट देणारा अभियंता निलंबित!

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या व अवैध पद्धतीने सूट देणाऱ्या दुय्यम अभियंत्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे.

या प्रकाराची तातडीने चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यासह एकूण तीन जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसात फिर्याददेखील दाखल केली आहे.

ब्रिटन (यूके)मध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी सजगता म्हणून राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती २१ डिसेंबर २०२०पासून लागू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून युकेसह, इटली, दक्षिण आफ्रिका, युरोप व मध्य-पूर्व देशांमधून हवाईमार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची तीन पाळ्यांमध्ये नियुक्तीदेखील केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेही कर्मचारी मदतीला नेमण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळावर उपरोक्त ठिकाणांहून आतापर्यंत सुमारे ४९ हजार ३६२ प्रवासी दाखल झाले आहेत. या प्रवाशांचे योग्यरित्या संस्थात्मक विलगीकरणदेखील करण्यात आले आहे. विलगीकरणातून सूट देण्याबाबतच्या नियमांचे पालन करताना काही अयोग्य घडत असल्याची बाब लक्षात आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्वतःहून विमानतळ प्रशासनासह संबंधिताना बारकाईने देखरेख करण्याबाबत गोपनीय पत्र दिले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)लादेखील सतर्क करण्यात आले. त्यानंतर हा गैरप्रकार उजेडात आला.

विमानतळावर कर्तव्यार्थ नेमलेल्या महानगरपालिकेच्या सेवेतील दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) दिनेश एस. गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट देत असल्याची, तसेच त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) यांनी हेरली. हा प्रकार त्यांनी रात्रपाळीवर कर्तव्यार्थ असलेले सत्रप्रमुख तथा महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हफिझ यांनी दिनेश गावंडे यांना विचारणा केली. तसेच सीआयएसएफच्या मदतीने झडती घेऊन त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली. यामध्ये अन्य आस्थापनांचे दोघेदेखील संशयित म्हणून आढळले आहेत. गावंडे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत घटनास्थळी पंचनामा करुन, साक्षी नोंदवून प्राथमिक अहवाल हा महानगरपालिकेचे उपायुक्त (भूसंपादन) तथा विमानतळ उपाययोजनांचे प्रमुख अनिल वानखेडे यांना सुपूर्द करण्यात आला.

घडल्या प्रकाराची तीव्रता पाहता तसेच प्राथमिक अहवाल आणि उपलब्ध पुरावे, तसेच साक्षीदारांचे लिखित यांच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने दिनेश गावंडे यास काल तत्काळ प्रभावाने निलंबित केले. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने गावंडे याच्यासह एकूण ३ जणांविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात फिर्याद (क्रमांक ०१३५०१२)देखील नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी गावंडेसह तिन्ही संशयितांना अटक केली आहे.

हवाईमार्गे प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. नियमांची कठोर अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असे आवाहन यानिमित्ताने प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content